जैसलमेर : राजस्थानातील श्रीगंगानगरमध्ये एका विवाहित महिलेने अविवाहित म्हणून एका युवकाशी लग्न करून त्याची फसवणूक केली आहे. श्रीगंगानगरमधील सीकर येथे ही घटना घडली असून सदर महिला तीन मुलांची आई असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. लग्नानंतर ती १२ दिवस आपल्या पतीसोबत राहिली. त्यानंतर ती आपले कपडे घेऊन पळून गेल्यावर तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
दरम्यान पोलिसांनी २८ वर्षांच्या लुटारू नवरी अमनदीपला अटक करून चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात सुरेश कुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले की लग्नासाठी मुलीच्या शोधात असताना त्यांची ओळख हनुमान नावाच्या एका मुलासोबत झाली.
त्यांनी एका मध्यस्थीच्या साहाय्याने अमनदीप नावाच्या महिलेची भेट घालून दिली. राकेश नावाच्या मध्यस्थी करणा-या युवकाने त्यांचे लग्न लावून दिले आणि फिर्यादीकडून नगदी २ लाख ३० हजार रुपये आणि खात्यावर ५३ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले होते. लग्नाच्या खर्चाचे कारण देऊन राकेश नावाच्या युवकाने फिर्यादीकडून तीन लाख रुपये लुटले असल्याच्े पोलिसांनी सांगितले आहे.
लग्न झाल्यानंतर अमनदीप काही दिवस आपल्या सासरी चांगली राहिली. त्यानंतर अमनदीप नावाची आरोपी आपल्या माहेरला जाते म्हणून निघून गेली ती परत आलीच नाही. तिने जाताना घरातील कपाटात ठेवलेले १६ तोळे सोने आणि ७५ हजारांची रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. त्यानंतर फिर्यादीने अमनदीपच्या कुटुंबियांना आणि राकेशला यासंबंधात विचारले असता त्यांनी या प्रकरणात फिर्यादीला धमकी दिली. त्यानंतर सुरेशने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन अटक केली आहे. त्यानंतर केलेल्या चौकशीत तिने पंजाबच्या एका पुरुषासोबत लग्न केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर तिने आपल्याला तीन मुले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दरम्यान याप्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.