नवी दिल्ली : राज्यासह देशामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुढील दोन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. देशातील अनेक राज्यात तापमान ४५ अंशावर गेले आहे. आज देशातील अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअल आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअर राहण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये देखील तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तसेच जोधपूर, बिकानेरमध्ये तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
तापमान ४२ अंशपार जाण्याचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये तापमान ४२ अंशापार जाण्याची शक्यता आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आण त्रिपुरामधील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
केरळात हलका पाऊस
अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल, केरळमध्ये हलका पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिर आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमेली, बागशेर आणि पिठोरगडसारख्या डोंगराळ भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाडा ४० पार
विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त आहे. मराठवाडा, विदर्भाच्या तुलनेत कमाल तापमान कमी असले तरी आर्द्रतेमुळे कोकण किनारपट्टीवर अधिक उकाडा जाणवतोय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरूवारी ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले. अकोल्यात ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सतत पाणी पिणे आवश्यक
वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून यात आणखी भर पडल्यास उष्माघाताशी संबंधित आरोग्य तक्रारी वाढू शकतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे, फिरतीचे काम असणा-यांनी सतत पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच लिंबूपाणी, फळांचे ज्यूस पिणेही गरजेचे आहे. कारण उकाडा जाणवल्यावर आपले शरीर हे पाणी आणि क्षार बाहेर फेकून स्वत:ला थंड ठेवत असते. मात्र पाणी वेळेत प्यायले नाही तर हीट स्ट्रोकचा धोका असतो.