नवी दिल्ली : निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केलीय. निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होईल, त्यानंतर २१ जुलै रोजी निकाल येतील. या निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष स्वत:चा उमेदवार उभे करण्याऐवजी अन्य पक्षाचा उमेदवार देण्याच्या विचारात आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारसह विरोधकही सक्रिय झाले आहेत. विशेषत: काँग्रेस राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये आपली ताकद अजमावत आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. इतकंच नाही तर सोनिया गांधींना कोरोनाची लागण झालीय. अशा स्थितीत समविचारी पक्षांशी संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवली आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. आता ते द्रमुकचे स्टॅलिन आणि टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. यानंतर एक बैठक बोलावण्यात येईल, यामध्ये कोणाला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनवता येईल यावर चर्चा केली जाईल, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. कॉँग्रेसला आपला उमेदवार न देता इतर कोणत्याही पक्षाला संधी द्यायची आहे, जेणेकरून एकीचा संदेश जाईल आणि विरोधकांना सोबत घेता येईल, असं काँग्रेस सूत्रांचं म्हणणं आहे.