सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या विधानावरून राज्यात चांगलाच राजकीय गदारोळ उडाला आहे. पण यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आज सांगलीत एकटवला.
यातून शरद पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत राज्यातील सत्ताधा-यांना सूचक इशारा देण्याचे टायमिंग साधले. परंतु सांगली इथल्या राष्ट्रवादी महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात सगळ्यात जास्त लक्ष लागले होते ते पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांच्याकडे! जयंत पाटील यांच्याशी त्यांचा पक्षातंर्गत असलेला संघर्ष बाजूला सारला आणि सांगलीत जात जयंत पाटलांबरोबर उभे राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष मध्यंतरी चांगलाच विकोपाला पोचला गेला होता. जयंत पाटील यांनी सात वर्षांनंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र सोडली. याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यातून पक्षात रचनात्मक बदल करण्याचा सूर आमदार रोहित पवार यांनी आळवला होता. यातून ते जयंत पाटील यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले होते. यातून दोघांमध्ये राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडत होत्या.
पक्षाच्या रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमात जयंत पाटीलांनी काही लोक माझ्या अध्यक्षपदासंबंधी महिने मोजत आहेत. मात्र मला राज्यात सरकार आणू द्या. त्यानंतर मी स्वत:च ‘नमस्कार’ करेन. माझ्याबद्दल काही तक्रारी असतील तर, थेट शरद पवारांच्या कानात सांगा. त्यांनी दोन कानशिलात दिल्या तर, त्या घेऊ. उगाच जाहीर वाच्यता करू नका असे फटकेबाजी केली होती.
लोकसभा निवडणूक निकालानंतर रोहित पवार यांच्याविषयी ‘संघर्षातही न डगमगणा-या युवा नेतृत्वाचा उदय’ असे जाहिरात स्वरुपातील लेख प्रसिद्ध केले, तर जयंत पाटील यांच्यातर्फे ‘विजयाचा सेनापती’ अशा मथळ्याची जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या दोघा नेत्यांमील ही विसंगती राज्यात चर्चेची ठरली असताना रोहित पवार यांनी, विजयाचा कोणी एक सेनापती नाही, हे यश शरद पवार आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचे सामूहिक असल्याचे जाहीरपणे सांगून, वादावर पडदा घातला.
















