रायपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी देशातून नक्षलवादाचा समूळ नाश करण्याची घोषणा केली होती. गृहमंत्र्यांच्या अल्टिमेटमला अवघे सहा दिवस बाकी असून नक्षललविरोधी मोहिमेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांनी गेल्या वर्षभरापासून केलेल्या कारवाईमुळे नक्षलावादी संघटना अतिशय कमकुवत झाली आहे. सुरक्षा दलांच्या सततच्या कारवायांमुळे अनेक मोठे नक्षल नेते ठार झाले असून भीतीपोटी अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळेच नक्षल चळवळ आता आपल्या सर्वात कमकुवत टप्प्यातून जात असल्याचे मानले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नक्षल चळवळीचा प्रमुख चेहरा मानला जाणारा गणपती देश सोडून नेपाळमध्ये पळाल्याची माहिती आहे. तर, त्याचा जवळचा सहकारी मिशिर झारखंडमध्ये लपून बसल्याचे सांगितले जाते. सुरक्षा यंत्रणांच्या मते, या दोघांना पकडण्यात यश आले, तर नक्षल संघटनेला मोठा धक्का बसेल. दंतेवाडा, नारायणपूर, बीजापूर आणि सुकमा हे जिल्हे एकेकाळी नक्षलवादाचे बालेकिल्ले मानले जात होते. मात्र आता या भागात रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या सुविधा वाढल्याने स्थानिक तरुण मुख्य प्रवाहाकडे वळत आहेत. तज्ज्ञांच्या मते, सुरक्षा दलांची सातत्यपूर्ण व अचूक कारवाई आणि सरकारची पुनर्वसन व विकास धोरणे, ही नक्षलवाद कमजोर होण्यामागे दोन मोठी कारणे आहेत.
मोठा नक्षल कमांडर पापा रावचे आत्मसमर्पण
बस्तरमधून नक्षल कमांडर पापा राव हा आपल्या १८ साथीदारांसह आत्मसमर्पण करत आहे. पापा राव अनेक गंभीर प्रकरणांमध्ये सहभागी होता आणि त्याचे नाव सुरक्षा दलांच्या वॉन्टेड यादीतही होते. हे आत्मसमर्पण केवळ औपचारिक नसून, नक्षल संघटनेचे खच्चीकरण होत असल्याचे संकेत मानले जात आहेत.
सुरक्षा दलांची रणनीती बदलली
विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी कारवाईची रणनीती बदलली आहे. केवळ चकमकींवर अवलंबून न राहता गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यात आली असून, स्थानिक नागरिकांशी विश्वासाचे संबंध निर्माण केले आहेत. याशिवाय, विकास कामांनाही गती देण्यात आली आहे. या सर्व बदलांमुळे अनेक नक्षल सदस्य मुख्य प्रवाहात परत येत आहेत.
आकडेवारी काय सांगते?
सुरक्षा दलांच्या अहवालानुसार, आतापर्यंत केलेल्या कारवाईत ४६३ नक्षलवादी ठार, तर १६०० जणांना अटक झाली आहे. याशिवाय, सुमारे २५०० जणांनी आत्मसमर्पणही केले आहे. हे आकडे नक्षल संघटना कमजोर होत असल्याचे स्पष्ट दाखवतात.
अनेक टॉप नक्षल कमांडर ठार
कारवाईत ठार झालेल्या मोठ्या नक्षल नेत्यांमध्ये सुधाकर, हिडमा, दामोदर, विकास, सुदर्शन, अनिल, रवि, मोहन, रमेश, शंकर तसेच इतर सेंट्रल कमिटी सदस्यांचा समावेश आहे.

