मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसच्या लोकांनी शिखांवर हल्ला केला, असे एक मंत्री पंजाबमध्ये जाऊन बोलले. त्यानी लक्षात घ्यावे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले आहे. नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशासाठी काम केले. पाकिस्तानला धडा शिकवला, त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांचीही हत्या झाली. त्यामुळे नेहरू कुटुंबाचा त्याग कुणी विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांची कुणासोबत तुलना होऊ शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी अमृतसरमध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरून केलेल्या वक्तव्याने वाद वाढला आहे.
राज्य मंत्रिमंडळातील एका नेत्याने इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. पण जगात देशाची प्रतिमा वाढवण्यात इंदिरा गांधी यांचा हात आहे. त्यांनी देशाच्या प्रतिमेशी कधीही तडजोड केली नाही. त्या मास्कोला गेल्या होत्या. त्या मास्को विमानतळावर उतरल्या. त्यावेळी त्यांच्या स्वागताला काही अधिकारी होते. ज्यावेळी त्या उतरल्या, त्यावेळी त्यांच्या दर्जाचा व्यक्ती आला नाही. त्या ठिकाणी भारतीय दूतावासाला इंदिरा गांधी यांनी विचारले, आपले शेड्युल काय आहे, त्यांनी देशाच्या प्रमुखांना भेटायला जायचे आहे, असे सांगितले. त्यावेळी इंदिरा गांधी म्हणाल्या, मला तुमच्या घरी यायचे आहे. गुजराल नावाचे भारतीय दूतावास होते. त्यांच्या घरी त्या गेल्या.
इंदिरा गांधी यांनी घरी गेल्यावर लहान मुलांना बोलवायला लावले आणि त्यांच्यासोबत खेळू लागल्या. रशियाचे अध्यक्ष भेटायला थांबले होते. परंतु इंदिरा गांधी यांनी जाणं पसंद केलं नाही. त्यांनी सांगितले, मी इथे आले, त्यावेळी यांच्या देशाच्या प्रमुखांनी येणे अपेक्षित होते. परंतु ते आले नाहीत. मी इथे इंदिरा गांधी म्हणून नाही तर ४० कोटी जनतेची प्रतिनिधी म्हणून आले आहे.
नेहरू हे नेहरूच
महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे अजिबात आम्हाला मंजूर नसल्याचे शरद पवार म्हणाले. एक गृहस्थ जवाहरलाल नेहरू बाबत बोलले. सध्या नेहरू आणि मोदी अशी अशी स्पर्धा लावली जात आहे. आता नेहरू यांच्यासोबत तुलना होऊ शकते का? अनेक वर्ष प्रधानमंत्री होते. इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचे काम नेहरू यांनी केले, ते आपण विसरू शकत नाही. नेहरू हे नेहरू होते. त्यांच्यासोबत तुलना होऊच शकत नाही, अशा शब्दात त्यांनी तुलना करणा-यांना फटकारले.
मोदींनी १२ वर्षांत देश
चुकीच्या दिशेला नेला
मुंबई : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम केल्याचा ढोल पिटला जात आहे. परंतु नरेंद्र मोदी यांचे १२ वर्षातील कर्तृत्व व देशासाठी योगदान काय हे शोधावे लागेल. गेल्या १२ वर्षात नरेंद्र मोदी देशाला चुकीच्या दिशेने घेऊन गेले, त्याची मोठी किंमत पुढील अनेक वर्षे देशाला मोजावी लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी नोक-या देणार, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला हमीभाव देणार, १०० स्मार्ट सिटी निर्माण करणार, दहशतवादाचा बिमोड करणार, पेट्रोल डिझेल ३५ रुपये लिटर तर गॅस सिलिंडर १०० रुपयाला देणार आणि ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, अशा राणा भिमदेवी थाटात घोषणा केल्या पण यातील एकही काम झालेले नाही. रुपया घसरत १०० च्या जवळ पोहचला, जीडीपी घसरला, ‘मेक इन इंडिया’ फेल गेला, ‘स्टार्टअप’ फेल गेला आणि अमेरिकेसमोर मोदी सरंडर झाले हे त्यांचे कर्तृत्व आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
















