अयोध्या : अयोध्येतील भव्य राम मंदिरात येणा-या देणगीच्या चोरीप्रकरणी विशेष तपास पथकाच्या चौकशीतून अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मंदिराच्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे माजी सदस्य अनिल मिश्रा यांनी पैसे मोजणा-या कर्मचा-यांसाठीच्या नियमांमध्ये शिथिलता आणली होती, ज्याचा गैरफायदा घेऊन ही चोरी करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. या प्रकरणात काही बँक कर्मचा-यांचेही संगनमत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून आता अनिल मिश्रा यांच्यावर कायदेशीर कारवाईची तयारी सुरू झाली आहे.
या मोठ्या गैरव्यवहारानंतर खडबडून जागे झालेल्या ट्रस्टने मंदिराच्या दानपेटीपासून ते पैसे मोजण्याच्या खोलीपर्यंतची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था पार बदलून टाकली आहे. एसआयटीच्या प्राथमिक चौकशीत, अनिल मिश्रा यांच्याकडेच आर्थिक व्यवहार, रोख रक्कम जमा करणं आणि पैसे मोजण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी होती. बँकेसोबत मिळून पैसे मोजणीचे नियम ठरवताना ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून तेच उपस्थित होते. असे असतानाही, पैसे मोजणा-या कर्मचा-यांचे कपडे, बायोमेट्रिक हजेरी आणि त्यांची तपासणी करण्याच्या कडक नियमांमध्ये अनिल मिश्रा यांनीच शिथिलता दिली होती. यामुळेच कर्मचा-यांना चोरी करणे सोपे झाले. या निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर आता कायदेशीर बडगा उगारला जाणार आहे. दरम्यान, चोरीच्या प्रकरणात तुरुंगात गेलेल्या कर्मचा-यांना सोडून इतर जुने कर्मचारी अजूनही काम करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील काही कर्मचा-यांची नियुक्ती हाउसकीपिंगच्या कामासाठी झाली होती, मात्र त्यांना पैसे मोजण्यासारख्या महत्त्वाच्या कामात लावण्यात आले होते.
सुरक्षा व्यवस्थेतील मोठे बदल
चोरीच्या या प्रकरणातून धडा घेऊन ट्रस्टने आता सुरक्षा आणि मोजणीच्या प्रक्रियेत अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. पैसे मोजणा-या कर्मचा-यांना आता खिशे नसलेला विशेष गणवेश घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. पैसे मोजण्याच्या ठिकाणी १३ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण मोजणी प्रक्रियेची व्हीडीओग्राफी केली जाणार आहे.
२७ अतिरिक्त विशेष सुरक्षा रक्षक
दानपेटया मंदिर आवारातून मोजणी केंद्रापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी २७ अतिरिक्त विशेष सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. गुप्त दानपेटी असलेल्या खांब क्रमांक ३४ जवळ अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता पैसे मोजण्याच्या कक्षात केवळ ४३ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल.
डिजिटल सही बंद; आता तिघांच्या सह्यांची सक्ती
ट्रस्टने केवळ सुरक्षाच नाही, तर बँकिंग व्यवस्थेतही मोठा बदल केला आहे. बँकेच्या कोणत्याही व्यवहारासाठी आता डिजिटल स्वाक्षरी चालणार नाही. त्याऐवजी सरचिटणीस डॉ. कृष्ण मोहन, मुख्य अभियंता जगदीश आफळे आणि सीए चंदन राय या तिघांच्या सह्या असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
















