उस्मानाबाद : २ मेट्रिक टन गांजा आणून देण्यासाठी आंध्र प्रदेशातील एकाच कुटूंबातील ६ व्यक्तींचे अपहरण करून भूम तालुक्यातील वांगी (बु.) येथे डांबून ठेवले. हा खळबळजनक प्रकार सोमवारी (दि. २७) उघडीस आला. या सर्वांची उस्मानाबाद पोलिसांनी सुटका केली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातील पोलिस त्यांना घेवून आंध्र प्रदेशाकडे रवाना झाले आहेत. हा प्रकार उघडकीस येताच खळबळ उडाली आहे.
वांगी (बु.), ता. भूम येथील सुभाषआण्णा पवार याने गांजा बाळगल्याने त्याच्याविरुध्द उस्मानाबाद व आंध्र प्रदेशात गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर सुटलेला आहे. त्याने आंध्र प्रदेशातील एका कुटुंबातील पाच व्यक्तींचे व त्यांच्याच एका नातेवाईकाचे अपहरण करुन त्यांना अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले होते. तसेच २ मेट्रिक टन गांजा आणून दिल्यावरच त्यांची सुटका करण्यात येईल, अशी धमकी सुभाष पवार याने अपहृतांच्या नातेवाईकांना दिली होती. या प्रकरणी आंध्र प्रदेशातील जीके विधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
तपासादरम्यान आंध्र प्रदेश पोलिसांचे पथक दि. २६ जून रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. त्यांना तपासादरम्यान भाषेची अडचण जाणवत होती. या पथकाने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कळंब विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले.
कळंब उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक पुजरवाड यांच्यासह पोलिस अंमलदार किरण अंबोरे, नवनाथ खांडेकर, महेश शिंदे यांच्यासह आंध्र पोलिसांच्या संयुक्त पथकाने दि. २६-२७ जून दरम्यानच्या रात्री आरोपी सुभाष पवार राहात असलेल्या वांगी (बु.), ता. भूम येथील परिसरात पाळत ठेवली. दरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की, सुभाष याच्या घरात नमूद अपहृतांना डांबून ठेवले आहे. यावर पथकाने २७ जून रोजी सकाळी सुभाष पवार यास ताब्यात घेतले.
६ जणांची यशस्वी सुटका
सुभाषअण्णा पवाराच्या घरात डांबून ठेवलेल्या पांगी कुटूंबीय गोवर्धन, धनलक्ष्मी, तरुण-वय ४ वर्षे, संदीप-वय २ वर्षे, यशोदा-वय १४ वर्षे यांसह जेम्मीली नागेंद्र बाबू सर्व रा. एबुलम, जी. के. विधी मंडल, जि. अल्लुरी सितारामाराजु, राज्य-आंध्र प्रदेश यांची पथकाने यशस्वी सुटका केली. आरोपी सुभाषआण्णा पवार यासह सुटका केलेल्या सहा व्यक्तींना घेवून आंध्र पोलिस आंध्र प्रदेशकडे रवाना झाले आहेत.