उस्मानाबाद : प्रतिनिधी
भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन एका नालीत जाऊन धडकली. या अपघातात एकजण ठार झाला तर अन्य चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा शिवारातील उड्डानपुलाजवळ घडला.
आंध्रप्रदेश राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील बैंसा येथील अभिषेक यशवंत मोरे हे 8 जानेवारी रोजी 4.30 ते 5 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा शिवारातील उड्डानपुलावरून जात होते. यावेळी अभिषेक मोरे यांनी आपल्या ताब्यातील कार (क्र. टीएस 18/डी/1910) ही भरधाव वेगात निष्काळजीपणे चालविली. त्यामुळे सदर कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजुला असलेल्या नालीत जाऊन धडकली. या अपघातात अभिषेक मोरे हे स्वत: मयत झाले.
तर कारमध्ये असलेले अन्य प्रवाशी राजेश्वर शंकर भुमनेरुल्ला, विशाल मदनकार, साईकिरण जेरीवाडा, राजु गुंजेवाड हे सर्वजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी राजेश्वर भुमनेरुल्ला यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून 8 जानेवारी रोजी भादंसं कलम 279, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.