उस्मानाबाद : लॉ विधी विभागासह अन्य विषयांच्या परीक्षा ऑनलाईन एमसीक्यू म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात यावी, या मागणीसाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात विद्यार्थ्यांनी ठिय्या करत शुक्रवारी (दि.८) उपकेंद्रातील प्रमुखांना घेराव आंदोलन केले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनास अनेक संघटनानी पाठिंबा दिला आहे.
सोलापूर, कोल्हापूर विद्यापीठच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी केली. अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसताना परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन पेटणार आहे. एलएलबी प्रथम वर्ष (तीन वर्षे कोर्स) व प्री लॉ प्रथम वर्षाच्या परीक्षा एमसीक्यू ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूरसह अन्य विद्यापीठ यांनी एमसीक्यू परीक्षा पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे औरंगाबाद विद्यापीठाने एमसीक्यूबाबत सकारात्मक विचार करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा. एलएलबी प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राचा निकाल हा २७ जून २०२२ रोजी लागला आहे. निकाल लागल्यानंतर दुसर्या सत्राचा अभ्यासक्रम कालावधी हा किमान ३ महिने असणे अपेक्षित आहे.
मात्र अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या एलएलबी प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राचे परीक्षेसाठीचे अर्ज भरणे सुरु असून त्याची कॉलेजस्तरावर मुदत ९ जुलैपर्यंत आहे. त्यामुळे विद्यापीठ वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊ शकते, त्यास अजून उशीर झालेला नाही. वस्तुनिष्ठ पर्यायबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा कुलगुरू यांना आहे. त्यामुळे ही विद्यार्थ्यांची मागणी मान्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.