अमरावती : महाराष्ट्र काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी अमरावती लोकसभेवर आमचाच हक्क असल्याचा दावा केला आहे. तसेच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर देखील त्यांनी सडकून टीका केली आहे. अमरावती लोकसभेवर आमचाच हक्क आहे. आमच्याकडे त्याकरिता सक्षम उमेदवार देखील आहे. जेव्हा महाविकास आघाडीची बैठक होईल, त्यात आम्ही अमरावतीच्या जागेसाठी शंभर टक्के मागणी करू, असे त्या म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी कायम देशातील युवा वर्ग आणि महिलांनी देशाचे नेतृत्व करावे, यासाठी प्रोत्साहन दिले आहे. युवा आणि महिला देशाच्या राजकारणात सक्रिय असायला पाहिजे. ही काँग्रेसची कायम भूमिका राहिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये देखील युवा आणि महिलांना उमेदवारी देण्याचा राहुल गांधी यांचा मानस असणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेनंतर आता भारत न्याय यात्रा सुरू झाली आहे. देशात बिलकिस बानो, महिला पहलवान यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही यात्रा सुरू राहील, असे त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.