नवी दिल्ली : भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. यासंदर्भातील माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. भारताच्या हल्ल्यांमध्ये क्षेपणास्त्र लाँचर्सचेही मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानला चीनकडून एचक्यू-९ हवाई संरक्षण प्रणाली मिळाली आहे.
पाकिस्तानी लोक चीनच्या ‘एचक्यू-९’ ची तुलना भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीशी करतात. पण आता भारताने एचक्यू-९ तांत्रिकदृष्ट्या एस-४०० समोर कुठेही टिकत नाही हे दाखवून दिले आहे. ‘एचक्यू-९’ ची रडार प्रणाली भारताच्या ब्राह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकेल अशी जवळजवळ कोणतीही शक्यता नाही. एस-४०० ची मारा क्षमता ४०० किलोमीटर आहे आणि ती खूप कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये एस-४००ची महत्वाची भूमिका
‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी हॅमर, स्कॅल्प आणि इतर अचूक शस्त्रांचा वापर केला. या ऑपरेशनमध्येही एस-४०० ने भारतीय हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शत्रूच्या कोणत्याही प्रतिहल्ल्याला हाणून पाडण्यासाठी ही प्रणाली सज्ज होती, यामुळे भारतीय लढाऊ विमानांना सुरक्षितपणे ऑपरेशन पूर्ण करता आले.