परभणी : शहरातील वसमत रोडवरील एकता नगर मधील नागरीकांना नवीन जलवाहिनी टाकल्यापासून मुबलक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देवून मनपा प्रशासनाने हा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी नागरीकांच्यावतीने मनपा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १५चे माजी नगरसेवक नंदकिशोर दरक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, दि.१६ मार्च रोजी एकता नगर येथील महिलांच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एकता नगरमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्यापासून एकता नगर गांधी विद्यालय परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही.
येथील नागरिक घरपट्टी, नळपट्टी रेगुलर भरत असून सुद्धा मनपा प्रशासनाच्या वतीने याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मनपा आयुक्त यांनी याकडे लक्ष देऊन एकता नगर मधील पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर माजी नगरसेवक नंदकिशोर दरक, पल्लवी देशपांडे, लता बावळे, भाग्यश्री जोशी, स्वाती मांडे, पल्लवी जोशी आदींसह एकता नगर येथील नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.