परभणी : मुलांना पळवून नेऊन त्यांना लाखो रुपयांच्या किमतीत परराज्यात विकणा-या एका टोळीला परभणी पोलिसांनी सोमवार, दि. ६ मार्च रोजी जेरबंद केले आहे. महिलांचा समावेश असलेल्या या टोळीकडून एका चार वर्षांच्या मुलाची सुटका करण्यात आली आहे.
या टोळीने आतापर्यंत चार लहान मुलांना ५ ते ६ लाखात विकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतलेल्या ११ आरोपींमध्ये ०८ परभणीतील रहिवासी आहेत तर अन्य मुंबई, हैदराबादचे असून एका विधि संघर्षग्रस्त मुलाचा यात समावेश आहे. परभणी पोलिसांच्या पथकाने ५ महिलांसह त्यांच्या ६ साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीला वैद्यकीय क्षेत्रातील काही मंडळी मदत करत असावी असा दाट संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना पोलिस अधीक्षक रागसुधा आर. म्हणाल्या की, पोलिस तपासात आरोपींनी धक्कादायक माहिती दिली आहे. काही मुलांना निपुत्रिक दाम्पत्यांना विकल्याचे टोळीने कबूल केले आहे. परराज्यातून लहान मुलांचे अपहरण करणे आणि पर राज्यात निपुत्रिक दाम्पत्यांना त्यांची विक्री करणे अशी या टोळीची कार्यपद्धती होती. ही टोळी ८० हजारांपासून ५ लाखापर्यंत पैसे उकळून मुलांची विक्री करायची. आंतरराज्य पद्धतीने कार्य करणा-या या टोळीला त्या-त्या राज्यांतील काही गुन्हेगार मुले पळवण्यासाठी मदत करत असावे असा संशय पोलिसांना आहे. ही टोळी गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय आहे. सध्या परभणी पोलिसांचे एक पथक सध्या परराज्यामध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास करत असून या टोळीच्या इतर सदस्यांचा शोध घेत आहे. या गुन्ह्यात एकूण १० आरोपींना ताब्यात घेतले असून १ विधीसंघर्ष बालक व एका महिलेस नोटीस देवून सोडण्यात आले आहे. आरोपीनी पो.स्टे. मंगलगीरी जिल्हा गुंटूर तसेच लातूर जिल्ह्यातील प्रत्येक एक अपहरणाच्या गुन्ह्याची देखील कबूली दिली आहे.
आरोपीमध्ये नुरजहा बेगम महमद इब्राहीम शाकेर, परवीन बी सादेक अन्सारी, शेख समीर शेख सरवर, पडेला श्रावणी, एम. रणजीत प्रसाद, संगिता पांचोली, नामीला सुर्या मांगया, शेख चाँद पाशा शेख सैलानी, राजेंद्र नरेश रासकटला, सय्यद मजहर अली सय्यद मोहम्मद अली, इरगा दिंडला शिल्पा यांचा समावेश आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, पालमचे पो.नि. प्रदीप काकडे, सिबर्चे पो. नि. संजय करनुर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शिवप्रसाद मुळे, मारुती करवर, श्रीमती कल्पना राठोड, जी. टी. बाचेवाड पोउपनि श्रीमती राधिका भावसार, साईनाथ पुयड, मारुती चव्हाण, व्यंकट कुसमे, नागनाथ तुकडे तसेच पो.मु.क्यु.आर.टी, कोतवाली, पालम, नवा मोंढा, एएचटी युनिटचे अंमलदार, स्था.गु.शा.चे अंमलदार, सायबर पो.स्टे. चे सर्व अंमलदार यांनी मिळून केली.