जिंतूर : शहरातील पठाण मोहल्ला परीसरात विजेची तार तुटून दुचाकीस्वाराच्या अंगावर पडल्याची घटना रविवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत १८ वर्षीय दुचाकीस्वार युवक शेखर चव्हाण गंभीर जखमी झाला आहे. विजेचा तीव्र झटका बसल्याने युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
शहरातील पठाण मोहल्ला परिसरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मागील अनेक महिन्यांपासून विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबद्दल माहिती देवूनही महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ या परीसरातून रविवारी शेखर चव्हाण हा युवक दुचाकीवरून जात असताना अचानक त्याच्या अंगावर विद्युत प्रवाह असलेली विजेची तार कोसळली़ विजेच्या तीव्र झटक्याने हा युवक दुचाकीवरून जमिनीवर पडले. परंतू विजेची तार हातात अडकल्याने त्याला विजेचे तीव्र झटके बसले. हा प्रकार परिसरातील सय्यद अबुजर यांनी बघितल्यानंतर त्यांनी लाकडाच्या सहाय्याने विजेच्या तारेपासून युवकाला बाजूला काढले.
परंतू या घटनेत युवकाचा दोन्ही हातांना गंभीर इजा झाली आहे़ परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी दुचाकीवर युवकास उपचारार्थ दाखल केले. परंतु युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ही घडल्याची चर्चा घटनास्थळावरील नागरिकांतून ऐकावयास मिळाली.
दरम्यान घटना घडतातच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपअभियंता कोळपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुपारी २ वाजेपर्यंत सेवा बजावून मी नांदेड येथे गेलो असून इतर कर्मचारी त्या ठिकाणी असल्याचे सांगितले. मी घटनास्थळी कर्मचारी पाठवतो असेही त्यांनी सांगितले. परंतू आषाढी एकादशी, बकरीद ईद सारख्या सनासुदीच्या दिवशी अधिका-यांची अनुपस्थिती राहत असल्यामुळे नागरिकांत संतापाची लाट दिसत आहे. यावर महावितरणाचे वरीष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.