परभणी : स्व. अॅड. शेषराव धोंडजी भरोसे (आबा) यांच्या स्मृती प्रित्यर्थ परभणी येथे संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने तिस-यांदा भव्य राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव दि.२३ ते २७ फेब्रुवारी कालावधीत संत तुकाराम महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन दि़२४ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष तथा संयोजक आनंद भरोसे यांनी दिली. या संदर्भात माहिती देण्यासाठी शनिवार, दि़१८ फेब्रुवारी रोजी पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते़ पुढे बोलताना कृषी संजीवनी महोत्सवाचे संयोजक भरोसे म्हणाले की, हा कृषी संजीवनी महोत्सव १० एकरात होत असून यात ६ दालन उभारण्यात येत आहेत.
हे दालन अत्याधुनिक डोम पद्धतीचे भव्य जम्बो मंडप उभारले जाणार आहेत़ तसेच प्री फॅब्रिकेटेड स्टॉलस उभारले जाणार आहेत. या प्रदर्शनात २०० हून अधिक कृषी उत्पादनाचे स्टॉल सहभागी होणार आहेत. या मंडपामध्ये कॉन्फरन्स हॉल देखील उभारण्यात येत असून त्यामध्ये शेतकरी बांधवाकरिता शेती विषयक चर्चासत्र व परिसंवाद, सरपंच परिषद, धान्य महोत्सव, परभणी जिल्ह्यातील प्रगतशील शेतक-यांचा गौरव, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान, बी, बियांने, शेंद्रीय शेती पद्धती, गांडूळ खत निर्मिती, पशु खाद्य, ट्रॅक्टर, आधुनिक शेती अवजारे, रासायनिक खते, कृषी मार्गदर्शक पुस्तके, ठिंबक सिंचन, सोलर उत्पादने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहपयोगी वस्तू, धान्य महोत्सव असे अनेक स्टॉल लागणार आहेत.
हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असून परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन संयोजक आनंद भरोसे व संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या कृषी संजीवनी महोत्सवात २४ फेब्रुवारी रोजी महिला बचत गट मेळावा होणार असून जिंका पैठणी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे़ तसेच २५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असल्याची माहिती संयाजेक भरोसे यांनी दिली़ स्टॉल बुकिंगसाठी इव्हेंट मॅनेजमेंट प्रमुख महेश बेद्रे व विशाल बोबडे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.