मानवत : शहरातील बायपास रोडवरील उड्डान पुलाजवळ मंगळवार, दि.१४ मार्च रोजी सकाळी ०८.१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ६१वर ट्रकने दुचाकीला उडवल्यामुळे भीषण अपघात झाला. या भीषण आपघातामध्ये शकुंतला विद्यालयातील दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाता नंतर ट्रक चालक फरार झाला आहे. मानवत येथील शकुंतला विद्यालयातील शिक्षक रामेश्वर नामदेवराव कदम (वय ५० वर्ष) रा.जिजाऊ नगर आणि त्यांचे सहकारी गंगाधर अंशीराम राऊळ (वय ५३ वर्ष) हे दोन शिक्षक आपल्या दुचाकी क्रमांक एमएच २२ एएच ७०३१ वरून शाळेकडे येत असताना पाथरीहून परभणीकडे भरधाव वेगात येणा-या ट्रक एमएच १३ आर ३६८४ ने जोराची धडक दिली. या अपघातात दोघाही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती अमर दहे यांनी ग्रामिण रूग्णालय येथे उपस्थित रूग्ण चालक उध्दव सावंत व विठ्ठल देवा पेडगावकर यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही जखमींना ग्रामिण रूग्णालयात नेले. या ठिकाणी डॉ.निर्णय बाकळे यांनी दोघांना तपासून मृत घोषीत केले. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोन्ही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर ट्रकचालक हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.