परभणी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावकारभारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी दि.२५ जानेवारी रोजी जाहीर होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवनिर्वाचित सदस्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र राज्य शासनाने सरपंचपदाचे ते आरक्षण रद्द ठरवत निवडणुकीनंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे निवडणूक रिंगणातील सरपंचपदाच्या इच्छुकांवर विरजन पडले होते.
सरपंच पदाचे आरक्षण कसे होईल याची माहिती नसतानाही काही सदस्यांनी आपली ताकद पणाला लावत आपलाच पॅनल विजयी केला. निवडणूक निकालानंतर ग्रामीण भागात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. तर मतदारांनी नवीन कारभा-यांची निवड केली. गावचा विकास करण्याचे आश्वासनही दिले. परंतू काही ठिकाणी पॅनलला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे आरक्षणानंतर सरपंचपद आपल्याच गटाकडे कसे राहील याची व्युहरचना आखली जात आहे.
शासन निर्णयानुसार आता ज्या पॅनलकडून निवडणूक लढवली त्यांच्यासोबत राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे गावकारभारी ठरवताना गाव पुढा-यांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागणार आहे. त्यातच नव्यानेच निवडून आलेल्या सदस्यांना आपल्याला संधी मिळते का यासाठी चाचपणी सुरू केली आहे. मात्र दोन दिवसानंतर चित्र स्पष्ट होईल.