पुणे : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून भीमाशंकर विकास आराखड्याला ‘खेड-आंबेगाव’ असे संयुक्त नाव देण्याच्या चर्चेमुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. यावर लोकप्रतिनिधींमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
भीमाशंकर विकास आराखड्याच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून खेड आणि आंबेगाव तालुक्यात लोकप्रतिनिधीमध्ये वाद रंगला आहे. विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
खेड येथे आमदार बाबाजी काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
वळसे पाटील यांनी समोर येत ‘खेड-आंबेगावमध्ये कोणताही संघर्ष नाही. काही जण मुद्दाम राजकीय वातावरण तापवून जनतेची दिशाभूल करत आहेत,’असा आरोप केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच भीमाशंकर विकास आराखड्याबाबत महत्त्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीत विकास आराखड्याच्या नावासंदर्भात चर्चा झाली. स्थानिक भावना लक्षात घेऊन आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडली होती.
वळसे पाटील म्हणाले, हा केवळ नावाचा प्रश्न नाही, तर वस्तुस्थिती समजून घेण्याचा विषय आहे. भीमाशंकर मंदिर भौगोलिकदृष्ट्या खेड तालुक्यात येते, हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही. मात्र मंदिर परिसरातील अनेक सुविधा, वाहतूक व्यवस्था, बाजारपेठ आणि सामाजिक संबंध आंबेगाव तालुक्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे विकास आराखड्याला संयुक्त नाव देण्याचा विचार पुढे आला. यात कुठेही तालुक्यांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा हेतू नाही.
काहींना फक्त विरोध करायची सवय
राजकीय टोलेबाजी करताना वळसे पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. ‘‘काही लोकांना स्वत: काही काम करायचे नसते. दुस-यांनी केलेल्या प्रत्येक कामात अडथळे आणणे आणि चुकीच्या गोष्टी पसरवणे, हीच त्यांची पद्धत झाली आहे. अशा प्रवृत्तीकडे मी फारसे लक्ष देत नाही,’ असे ते म्हणाले.
















