नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतातील घराणेशाही राजकारणावर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन प्रोजेक्ट सिंडिकेटसाठी लिहिलेल्या लेखात थरूर म्हणाले, भारतातील राजकारण हा एक कुटुंबाचा व्यवसाय बनला आहे. भारतीय राजकारण एक कुटुंब व्यवसाय आहे. या त्यांच्या लेखात थरूर यांनी लिहिले आहे की, भारताने घराणेशाही सोडून गुणवत्तेवर आधारित व्यवस्था स्वीकारण्याची वेळ आली आहे. यासाठी कायदेशीररित्या निश्चित केलेल्या पदाच्या अटी, अंतर्गत पक्ष निवडणुका आणि मतदार जागरूकता यासारख्या मूलभूत सुधारणांची आवश्यकता आहे.
थरूर यांनी त्यांच्या लेखात नेहरू-गांधी कुटुंबाचे वर्णन भारतातील सर्वात प्रभावशाली राजकीय कुटुंब असे केले आहे. त्यांनी लिहिले आहे की या कुटुंबाचा वारसा स्वातंर्त्य चळवळीशी जोडलेला आहे, परंतु यामुळे राजकारण हा काही कुटुंबांचा जन्मसिद्ध हक्क आहे अशी धारणा निर्माण झाली आहे.
अनेक कुटुंबांची उदाहरणे दिली
थरूर म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंबांनीही पिढ्यानपिढ्या सत्ता सांभाळली आहे, त्यांनी देशभरातील अनेक राजकीय कुटुंबांची उदाहरणे दिली. थरूर यांनी लेखात ओडिशात नवीन पटनाईक, महाराष्ट्रात उद्धव आणि आदित्य ठाकरे, उत्तर प्रदेशात मुलायम सिंह आणि अखिलेश यादव, बिहारमध्ये रामविलास आणि चिराग पासवान, पंजाबमध्ये प्रकाश सिंह आणि सुखबीर बादल, तेलंगणामध्ये केसीआर यांचे पुत्र आणि कन्या तसेच तमिळनाडूमध्ये करुणानिधी आणि त्यांचा पुत्र एमके स्टॅलिन यांच्या कुटुंबातील उत्तराधिकार लढाईचा उल्लेख केला आहे.
थरुर जोखीम घेतायेत : भाजप
भाजपने याला राहुल गांधी आणि काँग्रेस नेतृत्वाबद्दल असंतोषाचे लक्षण म्हटले आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की थरूर यांच्या टिप्पणीतून काँग्रेसच्या भविष्याबद्दलची त्यांची निराशा दिसून येते. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी थरूर यांच्या लेखाला खूपच अंतर्दृष्टीपूर्ण म्हटले आहे. ते म्हणाले थरूर अगदी बरोबर लिहितात की गांधी कुटुंबाने भारतीय राजकारणाला कौटुंबिक व्यवसायात रूपांतरित केले आहे. थरूर आता जोखीम घेणारे बनले आहेत, ते त्यांच्याच पक्षातील राहुल गांधींवर थेट हल्ला करतात.
घराणेशाही फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही : काँग्रेस
काँग्रेस नेते उदित राज म्हणाले की, घराणेशाही केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. ते म्हणाले, डॉक्टर, व्यापारी आणि अभिनेते देखील त्यांच्या कुटुंबाच्या मार्गावर चालतात. ते पुढे म्हणाले की, खरी समस्या अशी आहे की संधी काही कुटुंबांपुरत्या मर्यादित आहेत, ज्यामुळे इतरांना प्रगती करण्याची शक्यता मर्यादित होते. दरम्यान, काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनीही म्हटले आहे की, घराणेशाही केवळ राजकारणातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात प्रचलित आहे. ते म्हणाले, “लोकशाहीमध्ये जनता निर्णय घेते. केवळ वडील संसद सदस्य होते म्हणून कोणालाही निवडणूक लढवण्यापासून रोखता येत नाही.
थरूरांकडून मोदी सरकारचे कौतुक
काँग्रेस खासदार शशी थरूर हे पक्षाच्या अधिकृत मार्गापासून दूर जाणा-या त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा आणि जागतिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. अलिकडेच, त्यांनी ऑपरेशन सिंदूर या परराष्ट्र धोरण उपक्रमात भारताचे राजनैतिक प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यांच्या अलीकडील विधानांमध्ये केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाची आणि काही विरोधी राज्यांच्या धोरणांची प्रशंसा करण्यात आली आहे. ज्यामुळे पक्ष नेतृत्व अनेकदा अस्वस्थ झाले आहे.

