नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित ‘संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक’ मंजूर होऊ शकले नाही, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे संबोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (Delimitation) संबंधित विधेयक दोन-तृतीयांश बहुमताअभावी फेटाळण्यात आले होते त्यामुळे पंतप्रधान या भाषणात महिला आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची आणि विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य करण्याची शक्यता आहे.
“विरोधकांनी मोठी चूक केली असून त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील,” असे संकेत पंतप्रधानांनी आज सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले होते. त्यानंतर लगेचच या देशव्यापी संबोधनाची घोषणा करण्यात आली. गेल्या १२ वर्षांतील मोदी सरकारसाठी हा एक मोठा वैधानिक अडथळा मानला जात आहे. त्यामुळे आजच्या भाषणातून पंतप्रधान जनतेला कोणता संदेश देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

