नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर ‘मत चोरी’चा गंभीर आरोप केला आहे. मागील काही दिवसांपासून देशभरात या मुद्द्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता राहुल गांधी यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी अशा लोकांची भेट घेतली, ज्यांची नावेच मतदार यादीत नाहीत. हे लोक म्हणतात की, आम्ही तपासणी केली तेव्हा आम्हाला कळले की, आम्ही मृत आहोत. त्यावर राहुल गांधी म्हणतात निवडणूक आयोगाने तुम्हाला मारले आहे.
राहुल गांधींनी कागदोपत्री मृत झालेल्या काही लोकांची भेट घेतली. या भेटीचा व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हीडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की आयुष्यात अनेक मनोरंजक अनुभव आले आहेत, परंतु ‘मृत लोकां’सोबत चहा पिण्याची संधी कधी मिळाली नाही. या अनोख्या अनुभवाबद्दल राहुल गांधींनी मानले आयोगाचे आभार.
निवडणूक आयोगाने मृत घोषित केले
व्हीडीओमध्ये राहुल गांधी काही लोकांना भेटून म्हणतात की मी ऐकले की, तुम्ही लोक जिवंत नाही आहात? तुम्हाला मृत घोषित केले आहे. आपण मृत आहोत, हे तुम्हाला कसे कळले? त्यावर उपस्थितांपैकी एकजण म्हणतो आम्ही मतदार यादी तपासली, त्यात आमचे नावच नव्हते. त्यानंतर आम्हाला समजले की, कागदावर आम्हाला मृत घोषित केले आहे. त्यावर राहुल म्हणतात, निवडणूक आयोगाने तुम्हाला मारले आहे.
एका पंचायतीत किमान ५० मृत लोक
यावेळी राहुल गांधींनी विचारले की मृत घोषित झालेले किती लोक आहेत? त्यावर एक व्यक्ती सांगतो एका पंचायतीत किमान ५० लोक मृत आहेत. व्हीडीओनुसार, हे लोक राघोपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत, जो तेजस्वी यादव यांचा विधानसभा मतदारसंघ आहे.

