21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeराष्ट्रीयअनियमित दिनचर्येमुळे कर्करोग होण्याचा धोका!

अनियमित दिनचर्येमुळे कर्करोग होण्याचा धोका!

भोपाळ एम्सचे संशोधन, नाईट शिफ्टचे काम करणा-यांसाठी धोक्याची घंटा, जागरणामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत

भोपाळ : वृत्तसंस्था
धावपळीच्या युगात जगभरात जीवनशैली बदलली आहे. त्यातच अनेक ठिकाणी रात्र-दिवस कामाच्या शिफ्ट चालतात. त्यामुळे कामाच्या निमित्ताने आणि विविध कारणासाठी जागरण वाढले आहे. त्यातच नाईट शिफ्टमध्ये काम करणा-या लोकांसाठी चिंता वाढविणारी बातमी आहे. कारण रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे आणि अनियमित दिनचर्येमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यातून कर्करोग होण्याचा धोका वाढतो. एम्स भोपाळच्या नवीन संशोधनातून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एम्सच्या बायोकेमिस्ट्री विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक कुमार यांनी केलेल्या एका नव्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली असून, अतिजागरणाचा आरोग्यावर मोठा विपरित परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे. मानवी शरीर नैसर्गिक दिवस-रात्र चक्रावर चालते. याला आपण जैविक घड्याळ म्हणतो. ही सायकल आपली झोप, हार्मोन्स, पचन, ऊर्जा पातळी आणि रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करते. मात्र जेव्हा हे चक्र उशिरापर्यंत जागल्यामुळे किंवा नाईट शिफ्टमध्ये काम केल्यामुळे विस्कळीत होते, तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्याची आणि पसरण्याची शक्यता आहे.

एवढेच नव्हे तर कर्करोगाच्या पेशी शरीराच्या ऊर्जा प्रणालीचा वापर स्वत:च्या विकासासाठी करू शकतात. त्यामुळे रोगप्रतिकारक पेशींना कर्करोगाच्या पेशींना रोखण्यात अपयश येते. यातून आरोग्याला धोका पोहोचू शकतो, असेही सांगण्यात आले.

या संशोधनात कर्करोग रोखण्यासाठी केवळ औषधे गरजेची नाहीत, असे सांगतानाच नियमित आणि पुरेशी झोप, वेळेवर जेवण आणि संतुलित दैनंदिन दिनचर्या यामुळेही कर्करोगाचा धोका कमी होतो, असेही म्हटले आहे. भविष्यात कर्करोगाचा उपचार अधिक वैयक्तिकृत केला जाऊ शकतो, ज्यामध्ये रुग्णाची झोप, दैनंदिन दिनचर्या आणि जैविक घड्याळानुसार उपचार केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे उपचार अधिक प्रभावी होतील आणि औषधांचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल, असेही सांगण्यात आले.

निरोगी जीवनशैली आरोग्यासाठी खास
एम्सच्या डॉक्टरांनी लोकांना सल्ला देताना म्हटले की, ‘नियमित आणि वेळेवर झोपणे आणि उठणे, रात्री उशिरा मोबाईल फोन वापरणे टाळणे गरजेचे आहे. तसेच जेवण आणि व्यायामाचे वेळापत्रकही गरजेचे आहे. निरोगी जीवनशैलीमुळे केवळ सामान्य आजारच नव्हे तर कर्करोगासारख्या गंभीर आजारांनाही दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.

निरोगी जीवनशैलीसाठी संशोधन अत्यंत महत्त्वाचे
एम्स भोपाळचे कार्यकारी संचालक आणि सीईओ प्रो. डॉ. माधवानंद कर यांनी याबाबत सांगितले की, ‘या संशोधनात झोपेचा आणि कर्करोगाचा संबंध सांगण्यात आलेला आहे. हे संशोधन केवळ वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही तर सामान्य लोकांमधील जागरूकता वाढविण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR