वाराणसी : मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर प्रयागराज येथे संगम नगरीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, येथे एक मोठा वाद निर्माण झाला. पोलिसांनी ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या ताफ्याला संगम तीरावर जाण्यापासून रोखले, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसर नो-व्हेइकल झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, कोणत्याही मोठ्या ताफ्याला किंवा वाहनाला पुढे जाण्यास मनाई आहे. शंकराचार्य यांना संगम तीरावर जाण्यापासून रोखण्यात आले. पोलिसांनी ताफ्याला थांबवताच समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की पोलिस आणि शंकराचार्यांचे शिष्य यांच्यात धक्का-बुक्कीही झाली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी समर्थकांना मागे ढकलले, यामुळे संतांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव मेळा प्रशासनाने माध्यम कर्मचा-यांनाही हटवण्यास सुरुवात केली. एका अधिका-याने सांगितले की, शंकराचार्यांनी पायी जाण्याची विनंती केली होती. मात्र, ताफ्यातील अनुयायी दर्शनासाठी धावतात. यामुळे चेंगराचेंगरी होऊ शकते. विभागीय आयुक्त सौम्या अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, पूर्वपरवानगीशिवाय रथातून प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. तसेच, ताफा पायी जाताना कोणतेही अनुचित वर्तन किंवा सुरक्षेतील त्रुटी खपवून घेतली जाणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.

