सोलापूर : इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बालाजी शिवाजी कदम (रा. उंबरेपागे, ता. पंढरपूर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी मंजूर केला.
दि. ०२ नोव्हेंबर २०१२ रोजी फिर्यादी ज्ञानेश्वर ऊर्फ चांगदेव मुळे हे आपल्या शेतातील उसाच्या पिकास पाणी देण्याकरिता गेलेले असताना पाणी देऊन शेतालगत असलेल्या बांधावर झोपलेले होते. यावेळी बालाजी कदम व त्याच्या साथीदारांनी ज्ञानेश्वर मुळे यांचे हात व पाय धरून तुला जिवंतच ठेवत नाही, असे म्हणून पायाचे मांडीत कसलेतरी इंजेक्शन देऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या आरोपावरून बालाजी कदम याच्याविरुद्ध करकंब पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
यातील आरोपी बालाजी कदम याचा अटकपूर्व जामीन अर्ज पंढरपूर सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपीने अॅड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीची पुतणी अंजली सुरवसे हिच्या खुनाबद्दल फिर्यादीच्या नातेवाईकाविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणाला शह देण्यासाठी आरोपीला या खटल्यात गुंतवले असल्याचा युक्तिवाद बचावपक्षाच्या वतीने केला. याप्रकरणी आरोपीतर्फे अॅड. जयदीप माने, अँड. विलासिनी बी., अॅड. सिद्धेश्वर खंडागळे यांनी तर सरकारतर्फे अॅड. पी. एन. दाभोळकर यांनी काम पाहिले.