सोलापूर : सोलापूर शहरातील पूना नाका ते हैद्राबाद नाका रोड वरील धोत्रीकर वस्ती येथे भुयारी मार्ग नसल्यामुळे अपघात होऊन एका व्यक्तीचा बळी गेला. आत्तापर्यंत जवळपास सहा बळी गेले आहेत. सततच्या अपघातामुळे संतप्त होऊन मंगळवारी तेथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भुयार मार्ग करण्यात यावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले.
विशेष म्हणजे या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश पाटील, संजय कणके, प्रा. अशोक निंबर्गी एकत्र आले होते. नागरिकांना रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी हायवेवरून जावे लागते भरधाव जाणाऱ्या मोठ्या वाहनामुळे या भागात सतत अपघात होत आहेत, नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
या सततच्या अपघातामुळे संतप्त होऊन सुरेश पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी, संजय कणके यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले. तेथून सात रस्ता येथील नवीन नियोजन भवन येथे जाऊन ताबडतोब भुयार मार्ग करण्यात यावे या मागणीचे निवेदन निवासी अप्पर जिल्हाधिकारी पवार यांना देण्यात आले. पवार यांनी संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे सांगितले.