सोलापूर : उजनीच्या पाण्याचा प्रश्न सोलापुरात ज्वलंत झाला आहे. लाकडी निंबोळी योजनेअंतर्गत उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर आणि बारामती येथे वळवण्यात आले आहे. यावरून सोलापुरात पालकमंत्री बदलाची मागणी होत आहे. उजनी धारणातील पाणी वळवून कुठेही जाऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली होती. या अनुषंगाने पालकमंत्री बदलले जाणार का, असा प्रश्न पालकमंत्री दत्ता भरणे यांना विचारण्यात आला असता त्यांनी संतापात पालकमंत्री बदलणे सोपे नाही. तो बदलायला भाजीपाला आहे का, अशा शब्दांत उत्तर दिले.
पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. हे पद बदलणे एवढे सोपे नाही असेही त्यांनी विरोध करणा-यांना सुनावले. सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी उजनी पाणी प्रश्नावरून संताप व्यक्त केला होता. सोलापूरच्या हक्काचे पाणी कोणी पळवत असेल तर आम्ही रान पेटवू, असे त्या म्हणाल्या होत्या. त्याबाबत पालकमंत्री भरणे यांना विचारले असता ते म्हणाले, आ. प्रणिती शिंदे खूप अभ्यासू आहेत. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. त्यांनी इरिगेशन खात्याकडून माहिती घ्यावी. त्यांचा गैरसमज दूर होईल.
पालकमंत्री दत्ता भरणे शनिवारी सोलापूर दौ-यावर आले होते. पार्कचौक अहिल्यादेवी होळकर पुतळ््याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. जिल्हाधिकारी शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, स्मार्ट सिटीचे सीईओ ढेंगळे पाटील आदी अधिका-यांसोबत त्यांनी जिल्हा नियोजन आढावा बैठक घेतली आणि योग्य त्या सूचना दिल्या.