माळशीरस : पुरंदावडे/ पुंदावडे ग्रामपंचायतच्या हद्दीतून अखंड प्लेटचा उड्डाणपूल जात आहे. त्यामुळे दोन्ही गावचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आजूबाजूच्या गावांचे दळणवळण व उद्योग व्यवसाय शेतकरी ऊस वाहतूक शाळकरी विद्यार्थी आवागमन धोक्यात आले आहे.
जर प्लेटचा उड्डाणपूल झाला तर सर्व व्यापारी वर्गाचे गावातील रहिवाशांचे अतोनात नुकसान होणार आहे कारण सदाशिवनगर पुरंदावडे गाव हे ज्यादा प्रमाणात रोडच्या कडेला वसलेले असून या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिला गोल रिंगण सोहळा पार पडतो तसेच सहकारी साखर कारखाना, मंगल कार्यालय, दूध चीलिंग सेंटर, अंगणवाडी ते बारावीपर्यंत शाळा, पेट्रोल पंप ,पोस्ट ऑफिस, सहकारी बँक महसूल ऑफिस ,ग्रामपंचायत कार्यालय, दवाखाने हे सर्व रोडच्या दोन्ही बाजूलाा आहेत.
जर प्लेटचा उड्डाणपूल झाला. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी गोल रिंगण सोहळ्यास खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे तसेच कारखाना चालू सीझनमध्ये बैलगाडी घंटागाडी ट्रॅक्टर व ट्रक मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक करत असतात त्यामुळे या ठिकाणी दुकान समोर गाड्या लावण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच कारखाना व मोठीशाळा असल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी नागरिक ग्रामस्थ प्रवासी व्यापारी औषध उपचार खते बी बियाणे शालेय व शासकीय कामानिमित्त सदाशिवनगर पुरंदावडे या ठिकाणी येत असतात तरी स्थानिक नागरिक व्यापारी विद्यार्थी शेतकरी वर्ग यांचे जनजीवन प्रचंड प्रमाणात प्रभावित होणार आहे. या अनुषंगाने प्लेटचा उड्डाणपूल रद्द करून कॉलमचा उड्डाणपूल करण्यात यावा यासाठी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी गावातील सर्व पक्षीय नेते मंडळी राजकीय भेदभाव बाजूला ठेवून उड्डाणपूल साठी एकत्र आले होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून आंदोलनात सुरुवात करण्यात आली त्यानंतर सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलन गावातून मोर्चा रॅली काढण्यात आली यानंतर मोर्चा ग्रामपंचायत येथे आल्यावर रास्ता रोकोसाठी सर्वांनी रस्त्यावर ठाण मांडले यावेळी गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी उड्डाणपूल समितीचे अध्यक्ष पोपट दरगडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले त्यानंतर गावातील जेष्ठ मंडळीची भाषणे झाले यानंतर प्रकल्प संचालक पंढरपूरचे प्रतिनिधी प्रसाद तसेच विभागीय अधिकारी अकलूजचे समिंदर यांना मोर्चाचे निवेदन देण्यात आली .त्यांनी जो पर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचे आश्वासन दिले .सदाशिवनगर व पुरंदावडे गावातील सर्व ग्रामस्थ व्यापारी व गाळेधारकांनी यावेळी आपली दुकाने उस्फूर्तपणे बंद ठेवून मोर्चात सहभाग नोंदवला.