सोलापूर, 31 जुलै: सोलापुरात महावितरणच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महावितरणच्या ढिसाळपणामुळे एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावात ही घटना घडली आहे. अरुण खांडेकर (वय-34) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.
अरुण खांडेकर यांच्या शेतातून गेलेल्या वीज कनेक्शनची वायर मागील दोन महिन्यांपासून जमिनीवर पडून होत्या. त्याबाबत ग्रावकऱ्यांकडून वारंवार महावितरण प्रशासनाला लेखी आणि तोंडी निवेदन देवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर शनिवारी विजेचा शॉक लागून अरुण खांडेकर यांचा जागेवरच मृत्यू झाला.
मिळालेली माहिती अशी की, अरुण खांडेकर हे यांचे बक्षी हिप्परगा गावात शेत आहे. सकाळी गवत कापण्यासाठी ते आपल्या शेतात गेले असता नजरचुकीने त्यांचा स्पर्श महावितरणच्या तारांना झाला. त्यामुळे त्यांना विजेचा जबर धक्का बसला आणि त्यानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान मागील सहा महिन्यापासून ग्रामपंचायतीच्यावतीने महावितरण प्रशासनाला तक्रार देण्यात आली होती. तरीही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र महावितरण प्रशासनाने याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.
Read More आंदोलन तीव्र करणार, दूध उत्पादकांचा 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार