सोलापूर : उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाबाबत स्मार्ट सिटी आणि पोचमपाड कंपनी यांच्यातील तडजोड प्रस्तावावर तब्बल चार तास चर्चा होऊनदेखील स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय झाला नाही. सोमवार, २४ एप्रिल रोजी यासंदर्भात लवादाकडे सुनावणी होणार आहे अशी माहिती सीईओ शीतल तेली-उगले यांनी दिली.
बुधवारी, सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक सात रस्ता येथील जिल्हा नियोजन भवन येथे चेअरमन असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल तेली-उगले, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह संचालक मंडळ या बैठकीला उपस्थित होते.
उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामासंदर्भात पोचमपाड कंपनीने लवादात धाव घेतली आहे. या संदर्भात स्मार्ट सिटी आणि पोचमपाड यांच्यात तडजोड करण्यासंदर्भात नियम अटी शर्तीचा अंतिम प्रस्ताव तयार करण्याच्या विषयावर चर्चा झाली. तब्बल चार तास या बैठकीत चर्चा झाली. पण अंतिम निर्णय झाला नाही.
पोचमपाड कंपनीने २७० एमएलडी योजनेचा कामासाठी ६१५ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. त्यास पोचमपाड कंपनीने सहमती दर्शवली आहे. मात्र, पूर्वीच्या ११० एमएलडी योजनेतील कामासंदर्भात वाद आहे. पोचमपाड कंपनीने अधिकचा झालेला खर्च १२८ कोटी रुपये मागत आहे तर स्मार्ट सिटी कंपनीने नुकसान झालेल्या १८७ कोटींवर दावा केला आहे. बैठकीत याच विषयावर दीर्घ चर्चा झाली. शेवटपर्यंत एकमत झाले नाही. येत्या २४ एप्रिलला लवादाकडे या प्रकरणाची सुनावणी होणार असून त्यापूर्वी निर्णय घेण्यात येईल, असे सीईओ तेली-उगले यांनी सांगितले.
पोचमपाड कंपनीने १२८ कोटी रुपये वाढीव खर्चाची रक्कम मागितली आहे. तर स्मार्ट सिटी कंपनीकडून १८७ कोटी रुपये नुकसानभरपाईचा दावा केला आहे. यामध्ये स्मार्ट सिटी कंपनीचे नुकसान टाळण्यासाठी सीईओ शीतल तेली-उगले यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी पुन्हा आता चर्चा होऊन यावर अंतिम निर्णय होणार आहे.