थेट १० व्या स्थानी घसरण, आरसीबीही सहाव्या स्थानावर
मुंबई : मुंबई इंडियन्सने आतापर्यंतचे चारही सामने गमावले आहेत. पण पाचवा सामना सुरू होण्यापूर्वीच मुंबईच्या संघावर तोंड लपवण्याची पाळी आली. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामना संपला आणि त्यानंतर मुंबईसाठी एक वाईट बातमी आली. चेन्नई आणि आरसीबी यांचा सामना होण्यापूर्वी चेन्नईचा संघ १० व्या स्थानावर होता आणि त्यांचा रनरेट हा -१.२११ असा होता. आरसीबी या सामन्यापूर्वी गुणतालिकेत सहा गुणांसह तिस-या स्थानावर होती आणि त्यांचा रनरेट ०.२९४ होता. मुंबई इंडियन्स या सामन्यापूर्वी शून्य गुणांसह नवव्या स्थानावर होती. पण हा सामना झाल्यावर गुणतालिकेत मोठे बदल झाले. आरसीबीला या सामन्यात मोठा पराभव पत्करावा लागला आणि त्यांची तिस-या स्थानावरून थेट सहाव्या स्थानावर घसरण झाली, तर चेन्नईच्या संघाने १० व्या स्थानावरून नववे स्थान पटकावले. मात्र, मुंबई इंडियन्सचा संघ १० व्या स्थानावर पोहोचला.
सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आता आयपीएलमध्ये सर्व संघानी गुण पटकावले आहेत. पण आतापर्यंत गुणतालिकेत मुंबईचाच संघ असा आहे की, त्यांना एकही गुण पटकावता आलेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर ही सर्वात मोठी नामुष्की ओढवलेली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सवर अशी पाळी कधीही आल्याचे चाहत्यांना वाटत नाही. पण आता मुंबईच्या संघाकडे ही वाईट वेळ दूर करण्याची चांगली संधी आहे.
कारण बुधवारी मुंबईचा सामना होणार आहे. या सामन्यात जर त्यांनी विजय मिळवला तर त्यांना पहिला गुण कमावता येणार आहे. त्यामुळे आता पाचव्या सामन्यात मुंबईचा संघ विजय साकारतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर विजयानंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत कितवे स्थान पटकावतो, याची उत्सुकताही सर्वांना असल्याशिवाय राहणार नाही.