अॅडलेड : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून ऍडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात ही लढत खेळली जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर भारतीय संघ जाहीर केला आहे.
सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणा-या पंत आणि शुभमन गिल यांना पहिल्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. सलामीसाठी मयांक अगरवालसोबत पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. फॉर्मात असणा-या गिल याला वगळण्यात आल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली आहे. तर हनुमा विहारीच्या रूपाने एकमेव अष्टपैलू खेळाडू संघात आहे. बुमरा, शामी आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर वेगवान मा-याची जबाबदारी असेल. तर अनुभवी अश्विनच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय संघ
मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, उमेश यादव, शामी, जसप्रीत बुमरा
राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे