मुंबई : भारताने श्रीलंकेला नमवत आठव्यांदा आशिया चषक उंचावला. त्यामुळे जगभरातून टीम इंडियाचे अभिनंदन करण्यात असून भारतीय खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. त्यातच, श्रीलंकन फलंदाजांना एकापाठोपाठ एक करत तंबूत पाठवणा-या गोलंदाज मोहम्मद सिराजचं कौतुक होत आहे.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह महिला टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजनेही मोहम्मदच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. मात्र, मितालीने यावेळी भारतीय संघाचे कौतुक करताना टीम इंडियाऐवजी ‘टीम भारत’ असे म्हटले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर अंतिम सामना रंगला होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने इतिहास रचत केवळ १६ चेंडूत श्रीलंकेचे ५ बळी घेतले. पहिल्या षटकांत जसप्रीत बुमराहने एक बळी घेतल्यानंतर सिराजने यजमानांना मोठे धक्के दिले. सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकन फलंदाजांनी गुडघे टेकल्यामुळे भारताच विजय सहज झाला. श्रीलंकेला ५० धावांवरच रोखल्यानंतर भारताने १० गडी राखून मोठा विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयात सिराजचा मोठा वाटा राहिला, त्यामुळेच त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताबही देण्यात आला. सिराजच्या गोलंदाजीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मास्टरब्लास्टर सचिने तेंडुलकरनेही टीम इंडियाच्या विजयाचे अभिनंदन करताना, सिराजच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. तर, मिताली राजनेही भारतीय संघाचे ट्विटरवरुन अभिनंदन केले आहे. मोहम्मदची फिरकी सनसनाटी होती, असे म्हणत त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. तसेच, भारतीय संघाचे कौतुक करताना, टीम इंडियाऐवजी टीम भारत म्हणत मितालीने संघाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. दरम्यान, मितालीच्या या ट्विटला सिराजनेही थँक्यू व्हेरी मच दीदी, असे म्हणत गोड रिप्लाय दिलाय.
दरम्यान, देशात इंडिया आणि भारत नावावरुन वाद सुरू असताना अनेक क्रिकेटर्संनेही या वादावर परखडपणे भाष्य केले होते. सुनील गावस्कर, विरेंद्र सेहवाग यांनीही भारत नावाचे समर्थन केले होते. आता, मितालीनेही टीम भारत म्हणत अभिनंदन केल्यामुळे तिच्या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे.