नवी दिल्ली : भारताच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक गोष्ट आज समोर आली आहे. भारताच्या क्रिकेट संघावर कोरोनाने आक्रमण केल्याचे आज पाहायला मिळाले. कारण भारतीय संघातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.भारताचा आज सामना युवा विश्वचषकात (१९-वर्षांखालील क्रिकेट) आयर्लंडबरोबर होणार होता. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच भारताच्या संघावर कोरोनाने आक्रमण केल्याचे पाहायला मिळाले.
भारताच्या संघातील कर्णधार यश धुल आणि उपकर्णधार एस.के. रशिद यांच्यासह सहा खेळाडूंना कोरोना झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या सामन्यासाठी निशांत सिंधूची हंगामी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. कर्णधार यश आणि उपकर्णधार रशिद यांच्यासह भारतीय संघातील सिद्धार्थ यादव, आराध्य यादव, वासू वत्स आणि मानव परख हे सर्व खेळाडू करोना पॉझिटीव्ह असल्याचे आता समोर आले आहे.भारतीय संघातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली असली तरी आयर्लंडबरोबरचा क्रिकेट विश्वचषकातील सामना रद्द करण्यात आला नाही. यावेळी निशांतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा सामना खेळला. कारण या विश्वचषकासाठी १७ सदस्यांचा संघ नेण्यात आला होता आणि हीच गोष्ट भारतीय संघाच्या पथ्यावर पडली.