नवी दिल्ली : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाने दुस-या कसोटी सामन्यात विजय मिळवत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ऑस्ट्रेलियात दाखल झालेला रोहित शर्माही आपला क्वारंटाईन कालावधी संपवत ३० डिसेंबरला संघात दाखल झाला. रोहित मेलबर्नमध्ये दाखल झाला आणि त्याने टीम इंडियातील आपल्या सहका-यांची आणि इतर सदस्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याला संघाचा उपकर्णधार करण्यात आले. पण एका महत्त्वाच्या कारणामुळे रोहित शर्मासह भारताच्या पाच क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
मेलबर्नमध्ये एका हॉटेलात या पाच खेळाडूंनी जेवण केले. एका चाहत्याने त्यांचे बिल भरले. चाहत्याने खेळाडूंकडून पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर या खेळाडूंनी त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि त्या जोडीला धन्यवाद दिले. घडलेला प्रकार आणि व्हीडीओ त्या चाहत्याने ट्विट केला. या सर्व खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचेही या चाहत्याने सांगितले. मात्र बायो-बबलचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुभमन गिल या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ जिथे वास्तव्यास आहे, तेथून या पाच जणांना वेगळ्या ठिकाणी विलग करण्यात आले आहे. कोरोना संदर्भातील नियमावली लक्षात घेता इतर भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून या पाच खेळाडूंना सामन्यासाठी सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने शनिवारी रात्री (ऑस्ट्रेलियन स्थानिक वेळेनुसार) दिली.
मेलबर्नमध्ये पंतने चाहत्याला मिठी मारल्याची आधी बातमी मिळाली होती. पण नंतर त्या चाहत्याने असे काही घडले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून या घडलेल्या प्रकाराबाबत बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया तपास करत आहेत. या प्रकरणात कोरोना संदर्भातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहे का? याचा तपास केला जात आहे. प्राथमिक उपाय म्हणून ऑस्ट्रेलिया आणि भारतीय वैद्यकीय समितीच्या सल्ल्यानुसार या पाच खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रवासाच्या वेळी किंवा सराव करताना या पाच खेळाडूंना इतर खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात येणार आहे असेही सांगण्यात आले आहे.
टीम इंडियाने कोणताही नियम मोडलेला नाही; ते वृत्त निराधार; बीसीसीआयचा दावा
ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या भारतीय संघातील काही खेळाडूंनी कोविड-१९ संबंधी नियमांचे उल्लंघन करुन हॉटेलबाहेर जेवण केल्याचे वृत्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फेटाळून लावले आहे. भारतीय संघाचा कोणत्याही खेळाडूने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केलेले नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेले वृत्त निराधार असल्याचं भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. यजमान संघाला कोविड-१९ संदर्भातील सर्व नियमांची जाण आहे आणि त्यांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असं बीसीसीआयच्या एका अधिका-याने सांगितले.
वीजचोरीची माहिती देणा-यास बक्षीस – ऊर्जामंत्री नितीन राऊत