इंदूर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर आटोपला आहे. भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून आले आहे. कारण या पहिल्या डावात सर्वच्या सर्व विकेट्स या ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी घेतल्या आहेत. यामध्ये मॅथ्यू कुहनेमनने सर्वाधिक ५, नॅथन लायनने ३ आणि मर्फीने एक विकेट घेतली आहे.
भारताचा एक गडी धावचीत झाला आहे. भारताकडून विराटने २२ तर शुभमनने २१ अशा सर्वाधिक धावा केल्या आहेत.
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण फिरकी गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असणा-या या पीचवर भारतीय फलंदाज काहीच खास कामगिरी करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सुरुवातीला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कॅमरून ग्रीन यांच्याकडे चेंडू सोपवला. पण भारतीय फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा काढण्यास सुरुवात केली.
त्यामुळे लगेचच कर्णधार स्मिथने आपल्या फिरकीपटूंकडे चेंडू सोपवताच भारतीय संघ ढासळताना दिसला. एकही विकेट न गमावता २७ धावा केल्यानंतर भारतीय संघाने पुढील १८ धावांत ५ विकेट गमावल्या. ज्यानंतर पुढे कशातरी १०० पार धावा भारताने केल्या आणि ३३.२ षटकांत १०९ धावांवर भारताचा डाव आटोपला.
मॅथ्यू कुहनेमनचे जबरदस्त प्रदर्शन
दिल्ली कसोटीतून रेड-बॉल क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पण करणा-या मॅथ्यू कुहनेमनने दुस-या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. कुहनेमनला पदार्पणाच्या कसोटीत केवळ दोन विकेट मिळाल्या होत्या. पण आपल्या दुस-या कसोटीत कुहनेमनने पहिल्या चार षटकांतच टीम इंडियाला ३ धक्के देत एका डावात ५ विकेट्स घेण्याचा मान मिळवला. कुहनेमनने प्रथम कर्णधार रोहित शर्माला (१२ धावा) यष्टिमागे झेलबाद केले.
त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलला (२१ धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस अय्यरला (०) बोल्ड करून अखेर अश्विन आणि उमेश यादव या अखेरच्या फळीतील महत्त्वाच्या विकेट्सही त्याने घेतल्या. याशिवाय अनुभवी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा (१ धाव), रवींद्र जडेजा (४ धावा) आणि के. एस. भरत (१७ धावा) या विकेट्स घेतल्या. तर मर्फीने विराटची (२२ धावा) मोठी विकेट घेतली.
या मालिकेत एकूण ४ कसोटी सामने खेळवले जाणार होते, ज्यातील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करू शकतो.