चेन्नई : तामीळनाडू सरकार द्रमुकच्या (डीएमके) दयेवर चालले असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असा दावा द्रमुकचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केला आहे. डीएमकेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्टॅलिन यांनी तमिळगा वेत्री कळहम पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री विजय यांच्यावरही हल्ला चढवला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निलाकांना राजकीय लाट नाही तर सिनेमाची त्सुनामी असे म्हटले.
मतदार केवळ आपल्या आवडत्या अभिनेत्याने नवा पक्ष काढला या उत्साहापोटी वाहून गेले. त्यांनी उमेदवारांच्या राजकीय परिपक्वतेवर नाही, तर अभिनेत्याच्या लोकप्रियतेवर मतदान केले आहे, असेही स्टॅलिन म्हणाले. लोकांनी उत्साहाच्या भरात मतदान केले आहे. पण अवघ्या काही दिवसांतच त्यांचा या खेळण्यातील रस संपेल. ज्याप्रमाणे एखादे लहान मूल सरतेशेवटी आपल्या आईला शोधते, त्याचप्रमाणे तामिळनाडूची जनता पुन्हा एकदा डीएमकेचाच शोध घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांवरही स्टॅलिन यांनी परखड भाष्य केले. कम्युनिस्ट पक्ष, विदुथलाई चिरुथाईगल कात्ची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांसारख्या पक्षांनी सुरुवातीला टीव्हीके सरकारला केवळ बाहेरून पाठिंबा दिला होता, मात्र नंतर ते थेट कॅबिनेटमध्ये सामील झाले, असे स्टॅलिन म्हणाले. तसेच आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. पण हे सरकार ५ वर्षे पूर्ण करणार नाही हे नक्की, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तमिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांपैकी बहुमतासाठी ११८ जागांची गरज असते. मात्र विजय यांच्या टीव्हीके पक्षाला केवळ १०८ जागा मिळवता आल्या. काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांच्या कुबड्या घेऊन हे सरकार स्थापन झाले. यावरही स्टॅलिन यांनी प्रश्न उपस्थित केला. टीव्हीकेला स्वत:च्या बळावर बहुमतही सिद्ध करता आलेले नाही. आज हे सरकार केवळ आमच्या दयेवर टिकून आहे. हे सरकार कधीही आणि कोणत्याही दिवशी कोसळू शकते, असा इशारा त्यांनी दिला. तसेच अण्णाद्रमुकला फोडण्याचे प्रयत्न झाले, परंतु ते अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.
















