मुंबई : प्रतिनिधी
‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणा-या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिका-यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता ५ फेब्रुवारी ऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याच वेळी राज्यातील काही शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा असल्यामुळे संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देऊन, पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संबंधित जिल्हाधिका-यांना निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार देशातील सर्व कार्यरत शिक्षकांनी निश्चित कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी/सीटीईटी) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षकांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी अर्ज केलेले आहेत. ही परीक्षा ७ व ८ फेब्रुवारीला होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.
नवीन कार्यक्रमानुसार आता ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान आणि ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. तारखा बदलल्याने परीक्षा देणा-या शिक्षकांची अडचण झाली होती. इलेक्शन ड्युटी लागल्यास परीक्षेला जायचे कसे असा प्रश्न शिक्षकांसमोर होता. परंतु राज्य निवडणूक आयोगाने त्यांना निवडणुकीच्या कामातून सूट देऊन त्यांची सुटका केली आहे.

