24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeराष्ट्रीयभारत-चीन संघर्षात केंद्र सरकारने जबाबदारी झटकली

भारत-चीन संघर्षात केंद्र सरकारने जबाबदारी झटकली

राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली : भारत-चीन संघर्षाच्या काळात २०२० मध्ये केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि ती माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्यावर ढकलली, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने हा तपशील संसदेत वाचून दाखविण्यास नकार दिला असला तरी नरवणे यांच्या पुस्तकाबद्दल भारतीय तरुणांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे गांधी यांनी नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील प्रकरणातील यासंदर्भातला मजकूर संसद संकुलात वाचून दाखविला. चीनच्या घडामोडीसंदर्भात राहुल म्हणाले, माजी लष्करप्रमुख आपल्या पुस्तकात म्हणतात की, चीनने केलेल्या आक्रमक कारवायांबाबत ‘जो उचित समझो वो करो’ असे पंतप्रधान म्हणाले. नरवणे यांनी राजनाथसिंह यांना कॉल केला. त्यावर वरिष्ठ पातळीशी चर्चा करून काय ते कळवतो, असे उत्तर त्यांना मिळाले.

चिनी सैन्य आले तर आमच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर गोळीबार करू नका असा केंद्राचा आदेश असल्याचा दावा राहुल यांनी केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केलेल्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांतील महिला खासदारांनी हातात फलक घेऊन सत्ताधा-यांच्या बाकांच्या दिशेने कूच केले. त्यावेळी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. विरोधी सदस्य लोकसभेतील हौद्यात जमले. त्यांनी अमेरिकेशी झालेला व्यापार करार व माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकूर लोकसभेत वाचून दाखविण्यास मनाई केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा आणखी काही मुद्द्यांवरून लोकसभेत गदारोळ वाढल्याने काही वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. पण गदारोळ खूपच वाढल्याने अखेरीस सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

केंद्र सरकार घाबरले आहे : प्रियंका गांधी
काँग्रेस नेते प्रियंका गांधी यांनी सांगितले की भारताच्या सीमाभागात चीन कारवाया करत असताना केंद्र सरकारची प्रतिक्रिया काय होती, याबाबत माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी आपल्या अप्रकाशित पुस्तकात काही उल्लेख केले आहेत. त्यामुळे सरकार घाबरले आहे. त्यामुळे सरकार राहुल यांना संसदेत बोलू देत नाहीं. सरकार संसदेत चर्चेपासून पळ काढत आहे कारण ते घाबरलेले आहेत, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले.

परवानगी दिली असती तर… : शरद पवार
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील उतारे लोकसभेत उद्धृत करण्याची परवानगी दिली असती तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR