नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला रविवारीदेशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी गेल्या वर्षी देशाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. त्यांनी देशाच्या मुलींच्या कामगिरीचे कौतूक केले असून राष्ट्र उभारणीत महिलांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगत तरुण देशाला दिशा देत असल्याचे म्हटले जात आहे.
भारताच्या लोकशाहीचा प्रवास, संविधानिक आदर्श आणि सामुहिक जबाबदा-यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रकाश टाकला. त्यांनी प्रमुख राष्ट्रीय उपलब्धींचा उल्लेख करीत स्वांतत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. नागरिकांनी एक समृद्ध, आत्मनिर्भर आणि प्रगतीशील भारताची दिशेने सामूहिक रुपाने कार्य करत एकता, समावेशकता आणि दृढतेला मजबूत करण्याचा आग्रहही मुर्मू यांनी आपल्या भाषणात धरला. वंदे मातरम गीताला १०० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुढे म्हणाल्या की भारताचे नागरिक, देश आणि परदेशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजारा करु. प्रजासत्ताक दिनाच्या या शुभ दिवस भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील देशाची स्थिती आणि दिशेवर चिंतन करण्याची संधी आपल्याला प्रदान करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या स्वातंर्त्य आंदोलनाच्या शक्तीने १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाची स्थिती बदलली. आणि भारत स्वतंत्र झाला. आपण आल्या राष्ट्रीय भाग्याचे निर्माते बनलो.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की आमचे पोलिस कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दल देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. आमचे समर्पित डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी आपल्या नागरिकांची सेवा करतात. आमचे अभियंते देशाच्या विकासात भूमिका बजावतात. आमचे संवेदनशील नागरिक राष्ट्राला बळकटी देत आहेत. शेतक-यांमुळे परदेशात कृषी उत्पादने निर्यात केली जात आहेत.
महिलांनी अनेक विक्रम केले
त्या यावेळी म्हणाल्या की, देशातील ५७ कोटी जनधन खात्यांपैकी ५६% खाती महिलांकडे आहेत. १० कोटींहून अधिक बचत गट आहेत. आमच्या मुलींनी खेळात विक्रम प्रस्थापित केले आहेत.भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि अंध विश्वचषक जिंकला आहे. त्या म्हणाल्या की, ‘नारी शक्ती कायदा’ देशातील महिलांना अधिक सक्षम करेल. वंचितांसाठीच्या योजनांचा सातत्याने विस्तार केला जात आहे. देशाच्या विकासासाठी महिलांचा सक्रिय आणि सक्षम सहभाग आवश्यक आहे. त्यांच्या आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय प्रयत्नांमुळे अनेक क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढला आहे.
भारताचा निरंतर विकास होत आहे
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारताचा सतत आर्थिक विकास होत आहे. आपण नजीकच्या काळात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत असेही यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.
महिला पारंपरिक कल्पना मोडीत आहेत
भारतीय महिला पारंपारिक कल्पना मोडीत आहेत आणि शेती आणि अवकाशापासून ते क्रीडा आणि सशस्त्र दलांपर्यंत राष्ट्र उभारणीत त्यांची महत्त्वाची भूमिका बजावत आहेत असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी सांगितले. स्वयं-मदत गटांशी संबंधित १०० दशलक्षाहून अधिक महिला विकासाला आकार देत आहेत आणि पंचायती राज संस्थांमध्ये महिलांचे अंदाजे ४६% प्रतिनिधित्व असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नारी शक्ती वंदना कायदा महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला आणखी बळकटी देईल, ज्यामुळे विकसित भारताच्या दृष्टिकोनात लिंग समानता केंद्रस्थानी येईल.

