लातूर: देशभरात सध्या विविध परीक्षांच्या पारदर्शकतेवरून तीव्र चर्चा सुरू असतानाच, ‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकारानंतर परीक्षा रद्द करण्याची नामुस्की सरकारवर ओढवली असून, या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर, लातूरचे आमदार आणि माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अखेर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. लातूरचा शैक्षणिक पॅटर्न हा कष्टातून उभा राहिला असून, काही घुसखोरांच्या गैरकृत्यांमुळे या लौकिकाला धक्का बसणार नाही, ‘लातूर पॅटर्न’ भविष्यातही अभेद्य आणि अजिंक्यच राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या संवेदनशील प्रकरणावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा समाचार घेताना त्यांनी, कोणत्या विषयावर बोलावे आणि न बोलावे याची परिपक्वता नसलेले सत्ताधारी पक्षाचेच उथळ पुढारी संदर्भहीन वक्तव्ये करत आहेत, अशी घणाघाती टीकाही केली. आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पेपरफुटी प्रकरणात सध्या सुरू असलेल्या चौकशीच्या गतीचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, या पेपरफुटीमुळे गुणवंत आणि कष्टाळू विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला असून हे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे. सध्या सीबीआय आणि इतर तपास यंत्रणा या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. राज्यात आणि देशभरात अनेकांना अटक झाली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची पाळीमुळे उखडून काढावीत, हीच प्रत्येक नागरिकाची आणि विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असून, न्यायालयाच्या माध्यमातून दोषींना कठोर शिक्षा होईल, जेणेकरून पुन्हा असे कृत्य करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सुरुवातीला टिप्पणी करणे योग्य वाटले नाही, असे सांगत आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मौन सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात ज्या पक्षाचे सरकार आहे, त्यांच्याच काळात पेपरफुटीचे असंख्य प्रकार घडले असून लाखो सुशिक्षित तरुणांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. असे असतानाही, सत्ताधारी पक्षाचे काही उथळ पुढारी या संवेदनशील प्रसंगात राजकीय पोळी भाजण्यासाठी जुने, तथ्यहीन संदर्भ जोडून सोशल मीडियावर वावड्या उठवत आहेत. वास्तविक, त्यांचीच वक्तव्ये आता संशयास्पद वाटू लागली आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत सर्वांनीच धीर धरण्याचा शहाणपणा बाळगायला हवा.
देशभरातील शैक्षणिक आणि नोकरभरती परीक्षांमधील पारदर्शकता हरवून गेल्याचा आरोप करत देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे भूमिकेचा पुनरुच्चार केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात एकूण ७० परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. केवळ यंत्रणेतील ढिसाळपणावर बोट न ठेवता काँग्रेसने याविरोधात संसदेपासून रस्त्यापर्यंत संघर्ष केला आहे, म्हणूनच सरकारला आता ‘नीट’ प्रकरणात ठोस पावले उचलणे भाग पडले आहे, असे त्यांनी नमूद केले.
लातूर येथील एका निवृत्त प्राध्यापकाला आणि शिकवणी क्लास चालकाला झालेल्या अटकेचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला म्हणून संपूर्ण समाज गुन्हेगार ठरत नाही. लातूर पॅटर्न हा विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, पालक आणि संस्थाचालकांच्या अथक व सातत्यपूर्ण परिश्रमातून उभा राहिला आहे. आजवर अनेकांनी या पॅटर्नला हरवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी अभेद्य राहिला आहे. लातूरच्या शैक्षणिक वातावरणावर आलेले हे सावट तात्पुरते असून, ते लवकरच दूर होईल आणि लातूर पॅटर्न बावन्नकशी सोन्याप्रमाणे पुन्हा झळाळून निघेल.
शेवटी, लातूरचा शैक्षणिक लौकिक कायम राखण्यासाठी आणि या पॅटर्नची चकाकी अधिक वाढवण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटक, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्याच जिद्दीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करत लातूरचा लोकप्रतिनिधी म्हणून यापुढेही आवश्यक ते सर्व योगदान देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले.
















