मुंबई : प्रत्येक राजकीय पक्षाच्या आणि मतदाराच्या मनात जी शंका निर्माण झाली आहे. त्याची एक गोष्ट दुबार मतदार याद्यांची सुरू आहे. मात्र फक्त तिकडे लक्ष ठेवून चालणार नाही. २०१७ पासून मी ओरडून सांगतोय, त्यावेळी मी जे बोलत होतो, आज जे सोबत आहेत त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. मतदार याद्या आहेतच, पण ईव्हीएम मशिनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
स्वप्नांची राखरांगोळी जर ईव्हीएम मशीन करणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय असा सवाल करत राज ठाकरे यांनी मतचोरीवर भाष्य केले. प्रत्येकवेळी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मतचोरी मुद्यात महाराष्ट्रच पुढे येईल असे त्यांनी सांगितले. मनसेच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
यात राज ठाकरे म्हणाले की, गेली अनेक वर्ष आपण हे ओरडून सांगतोय. मागील १०-१२ वर्षात हे सुरू झाले आहे. लोक आपल्याला मतदान करतायेत. पण या भानगडीतून आपल्याला दरवेळी पराभव पत्करावा लागतो. अख्खा देश यावर बोंबलतोय. या प्रक्रियेतून सत्तेत यायचे आणि हवी तशी सत्ता राबवायची. मतदार याद्या स्वच्छ करा अजून १ वर्ष निवडणुका लागल्या नाही तरी चालेल.
मतदार याद्या स्वच्छ करा आणि निवडणूक घ्या, तुम्ही जिंकला ते आम्ही मान्य करू. सगळ्याळ्या गोष्टी लपवायच्या आण त्यातून निवडणूक घ्यायची, म्हणजे मॅच फिक्स आहे. क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग झाल्यावर खेळाडूंना काढण्यात आले. सीसीटीव्ही कॅमे-यातील शुटींग ही प्रायव्हेसी आहे. एखादा माणूस मत कुठे देतोय ही प्रायव्हसी असू शकते. निवडणूक आयोग कुठलीही उत्तरे देतो अशी टीका त्यांनी केली.
तर महाराष्ट्रात जो मोर्चा निघेल तो दणदणीत झाला पाहिजे. महाराष्ट्रात काय आग पेटलीय हे दिल्लीला कळायला हवे. मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्रात काय राग आहे तो दाखवून द्या. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रामाणिक मतदारांचा हा अपमान सुरू आहे. मतदार उन्हात रांगेत उभे राहत आहे. मात्र त्यांच्या मताचा अपमान केला जात आहे. या देशातील निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत. जय कुणाचा पराजय कुणाचा हे निवडणुकीनतंर पाहता येईल. प्रगत देशात आजही बॅलेट पेपरवर मतदान होतात. जेवढे पुढारलेले देश आहे तिथे बॅलेट पेपर वापरला जातो. १ तारखेच्या मोर्चाला मी लोकलने जाणार आहे असे राज ठाकरे यांनी म्हटले.

