विशेष प्रतिनिधी, श्रीक्षेत्र माहूर: स्वातंत्र्य मिळून पाऊण शतकापेक्षा जास्त काळ लोटला तरीही ज्या गावाला हक्काची लालपरी (एस.टी. बस) पाहता आली नव्हती, अशा सावरखेड गावाचा वनवास अखेर संपला आहे. माहूर-सावरखेड मार्गावर स्वातंत्र्यानंतर प्रथमच राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) अधिकृत बससेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्यांदाच गावात आलेल्या लालपरीचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण गावाने अभूतपूर्व जल्लोष केला. गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून, फटाक्यांची आतिषबाजी करत हा ऐतिहासिक दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला.
अनेक वर्षांची प्रतीक्षा आणि नागरिकांचे हाल
सावरखेड परिसरातील नागरिकांना आजवर हक्काची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती. वाहतुकीचे कोणतेही साधन नसल्यामुळे येथील शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना मैलोन्मैल पायी प्रवास करावा लागत होता. आजारपणाच्या काळात किंवा आणीबाणीच्या प्रसंगी खासगी वाहनांचा महागडा आसरा घ्यावा लागत असल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत होते. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ या मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी करत होते, मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आले होते.
लोकप्रतिनिधींची तत्परता आणि ‘शिवसैनिकाचा’ पाठपुरावा
ही बिकट परिस्थिती बदलण्यासाठी स्थानिक शिवसैनिक लक्ष्मीकांत उर्फ ‘आर्शीवाद’ कदम यांनी कंबर कसली होती. त्यांनी या बससेवेसाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर सातत्याने आक्रमक पाठपुरावा सुरू ठेवला होता. ग्रामस्थांची हीच अनेक वर्षांची तीव्र अडचण लक्षात घेऊन त्यांनी ही बाब शिवसेना गटनेते (विधानपरिषद) आमदार हेमंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार हेमंत पाटील यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून अजिबात वेळ न दवडता परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि माहूर-सावरखेड मार्गावर तात्काळ बससेवा सुरू करण्याचे कडक निर्देश दिले.
२४ मे रोजी सुटली पहिली बस!
आमदार पाटील यांच्या सूचनांनंतर परिवहन विभागाने युद्धपातळीवर हालचाली करत सर्व तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. अखेर आज, २४ मे रोजी माहूर-सावरखेड मार्गावर पहिली एस.टी. बस धावली. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी या बसला उदंड प्रतिसाद दिला.
कोणाला होणार फायदा?
विद्यार्थी: शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वेळेवर आणि सुरक्षित प्रवास करता येईल.
शेतकरी: शेतमाल बाजारात नेण्यासाठी आणि शेतीकामाच्या प्रवासासाठी मोठी सोय झाली आहे.
महिला व ज्येष्ठ नागरिक: हक्काच्या आणि सवलतीच्या दरातील प्रवासामुळे प्रवासातील कष्ट आणि आर्थिक भुर्दंड कमी होणार आहे.
अनेक दशकांनंतर का होईना, पण सावरखेड गावाला मुख्य प्रवाहाशी जोडणारी ही जीवनवाहिनी सुरू झाल्याने संपूर्ण परिसरात समाधानाचे आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
















