मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. जिल्हा परिषेदेच्या निवडणुकीसाठी १६ जानेवारी २०२६ रोजी सूचनेचे प्रकाशन होणार आहे.
अर्ज दाखल करण्याची १६ जानेवारी ते २१ जानेवारी अशी मुदत असणार आहे. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६ तर अंतिम उमेदवारी व निवडणूक चिन्ह वाटप २७ जानेवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत असणार आहे. मतदानाचा दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ६.३० ते सायंकाळी ५.३० मतमोजणीचा दिनांक ७ फेब्रुवारी होणार आहे.
या निवडणुकांसाठी १ जुलैची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र असणार आहेत. तसेच १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.
कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार?
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. तसेच पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्हा परिषदांसाठीही निवडणूक होणार आहे. तर मतदानाच्या २४ तास आधी प्रचाराची सांगता होणार आहे.
निवडणुकीचा असा कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६
नामनिर्देशन पत्राची छाननी – २२ जानेवारी २०२६
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – २७ जानेवारी २०२६ दुपारी ३ पर्यंत
अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप – २७ जानेवारी २०२६ दुपारी ३.३० नंतर
अंतिम उमेदवारांची यादी – २७ जानेवारी २०२६
मतदानाचा दिनांक – ५ फेब्रुवारी २०२६ – सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
मतमोजणी – ७ फेब्रुवारी २०२६ – सकाळी १० वाजल्यापासून.

