मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारने शुक्रवारी सादर केलेल्या २०२६-२७ च्या राज्य अर्थसंकल्पात अल्पसंख्याक समाजला पूर्णपणे दुर्लक्षित केले असून त्यांच्यासाठी एकही नवी घोषणा करण्यात आलेली नाही, अशी टीका समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना आमदार रईस शेख यांनी सांगितले की, गुरूवारी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात चालू आर्थिक वर्षात डिसेंबर २०२५ पर्यंत अल्पसंख्याकांसाठी मंजूर निधीपैकी ५० टक्क्यांपेक्षा कमी निधी खर्च करण्यात आला आहे. किमान या वर्षी महायुती सरकार अल्पसंख्याकांसाठी पुरेशी तरतूद करेल अशी अपेक्षा होती मात्र हा अर्थसंकल्प आमच्यासाठी मोठा निराशा ठरला असून तो अल्पसंख्याकांबाबत सावत्रपणाची वागणूक देणारा दिसतो असे आ. रईस शेख यांनी सांगितले.
महायुती सरकारने मुस्लिम आरक्षणाचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत आणि आता मुस्लिम समाजाला लक्ष्य करणारा धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत आम्ही अल्पसंख्याकांसाठी काही कल्याणकारी योजना जाहीर होतील, अशी अपेक्षा केली होती मात्र त्यांच्या अपेक्षांना हरताळ फासला आहे. या अर्थसंकल्पातून महायुती सरकारला मुस्लिम समाजाचे काहीही देणे-घेणे नाही, हे स्पष्ट होते, असे आमदार रईस शेख यांनी म्हटले.

