मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सहा खासदार एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याचेही बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही खासदारांबात गौप्यस्फोट केला होता. दरम्यान, आता या सर्व चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काल खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. सुळे म्हणाल्या, शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात गेले, ही घटना सर्वांना माहिती आहे. त्या भेटीमागची पार्श्वभूमी काय होती, हे मी काल राऊत यांना सांगितले आहे. कदाचित त्यांच्या मनात गैरसमज निर्माण झाले असतील, असेही सुळे म्हणाल्या. ज्यावेळी अजितदादा एनडीएमध्ये गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम सतराव्या दिवशी दादांना भेटून आली होती. हे वास्तव आहे. मी त्याचा असा अर्थ काढला की, उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि दादा उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे उद्धवजी फक्त दादांना शुभेच्छा द्यायला गेले असावेत. मी त्याचा वेगळा काही अर्थ काढला नाही आणि आम्ही ते समजून घेतले. दादांनी घेतलेला निर्णय आम्हाला अयोग्य वाटला होता, तरीही सशक्त लोकशाहीत संवाद असलाच पाहिजे, या मताची मी आहे.
आमचे खासदार नाराज नाहीत
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही खासदार नाराज आहेत, असा गौप्यस्फोट केला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, रेवतीच्या लग्नासाठीच पृथ्वीराजबाबा आले होते आणि तेव्हाच माझी व त्यांची भेट झाली होती. कदाचित तेव्हाच त्यांची आणि खासदारांचीही भेट झाली असावी. पण आमचा कोणता खासदार त्यांना अस्वस्थ वाटला, हे मला माहीत नाही. आम्ही आठही जण नेहमी एकत्र असतो आणि रोज एकमेकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे त्यांना नेमके कोण भेटले, याची मला कल्पना नाही. तरीही त्यांच्या कानावर अशी काही गोष्ट आली असेल, तर त्याबद्दल विचारणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही आणि समजा कोणी नाराज असले, तरी ते बाहेर जाऊन असे काही बोलणार नाही. माझा केंद्रीय मंत्रीपदाचा शपथविधी तर गेल्या १२ वर्षांपासून केला जातोय. आमच्याशी कोणीही बोलत नाही आणि आम्हीही कोणाशी बोलत नाही, असे स्पष्टीकरण सुळे यांनी दिले.
एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा नाही
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याबाबत माझ्यापर्यंत तरी कोणतीही चर्चा आलेली नाही.अजितदादा असताना स्वत: दादा, मी, जयंत पाटील आणि आमच्या पक्षातील काही नेते याविषयी बोलत होतो. दादा होते तोपर्यंत अजितदादांचीही एकत्र येण्याची इच्छा होती आणि आम्ही अनेकदा भेटलोही होतो. मात्र, आता दादा हयात नसल्यामुळे मला त्यावर काहीही बोलायचे नाही. त्यांचा पक्ष त्यांच्या मार्गाने जात आहे. आम्ही आमच्या मार्गाने पुढे जात आहोत असे सांगत सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या.















