छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे २० जानेवारी रोजी मुंबईतच्या दिशेने कूच करणार आहेत. मुंबई दौऱ्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाला महत्वाचा संदेश दिला. ते म्हणाले की, मराठे मुंबई निघणार आहेत. मराठा समाजाने आता घरी बसू नये. हे शेवटचे आंदोलन आहे. मराठा समाजाने ताकदीने मुंबईकडे निघावे. मराठे गुन्हे दाखल करून घेण्यास भीत नाहीत. जे ठरले आहे त्या मार्गाने मराठा समाज मुंबई जाणार आहे. आता आम्ही निघालो आम्ही आरक्षण घेणारच आहोत. आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आतापर्यंत दोन उपोषण झाले. हे आरक्षणासाठी शेवटे उपोषण असणार आहे.
जरांगे म्हणाले की, मी मारायला भीत नाही. मी मुंबईवरुन आता आरक्षण घेऊन येणार आहे. २६ तारखेला गल्ली गल्लीत मराठा समाज दिसणार आहेत. आपण शांततेत चाललो आहोत. पण आपल्यावर गुन्हे दाखल झाले तर राज्यात लोकशाही नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. शासनाकडून सुधारणा आणि दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून नेला जात आहे. अध्यादेश महत्त्वाचा आहे. पण ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना दाखले दिले पाहिजे. आता ५४ लाख लोकांना नोंदी मिळाल्या आहे. समितीने किती काम केले हे बघणे महत्वाचे आहे. ड्राफ्ट सुधारणा फक्त बहाणे आहेत. मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही.
सग्या सोयऱ्यांना आरक्षण द्या
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देणे खूप गरजेचे आहे. बचू कडू हे प्रामाणिक आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन ते पाळतात. यापूर्वी जे उपोषण सोडायला आले होते त्यांना मराठ्यांची गरज नाही का? मग ५४ लाख नोंदीच्या आधारे त्यांच्या सग्या सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र का देत नाही? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.