नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड असणा-या रुग्णांवर सरकारी आणि खाजगी रुग्णालयांत मोफत उपचार केले जातात. सरकारकडून रुग्णाचा ५ लाखांपर्यंत खर्च उचलला जातो. मात्र, आता आयुष्मान योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता काही आजारांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करता येणार नाहीत. यामध्ये मेंदू, प्रसुती आणि गर्भाशय शस्त्रक्रिया याचा समावेश आहे. नव्या नियमावलीनुसार आयुष्मान योजनेअंतर्गत हे आजार असलेल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयातच उपचार घ्यावे लागणार आहेत. सरकारी रुग्णालयात याबाबत सुविधा असल्याने निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आयुष्मान योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये मेंदू, प्रसूती आणि गर्भाशय शस्त्रक्रिया केली जात होती. मात्र, आता यापुढे या तीन आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया फक्त सरकारी दवाखान्यांमध्येच केली जाणार आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये या उपचारांसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता काही रुग्णांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पूर्वी खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये १७६० आजारांवर मोफत उपचार केले जात होते. मात्र, आता काही आजारांना खाजगी रुग्णालयांमधील मोफत उपचारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये या आजारांवर उपचार उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयुष्मान कार्डसाठी लागणारी कागदपत्रे
आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, फोन नंबर, रेशन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल. तसेच कामगार कार्ड, ई-श्रम कार्ड किंवा सरकारी ओळखपत्राच्या मदतीने कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र आहात की नाही, याची माहितीही मिळेल. ते पाहून तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो. त्यातून ५ लाखांपर्यंतच्या उपचाराचा खर्च सरकार उचलू शकतो.
















