Homeमहाराष्ट्रअर्थसंकल्पातील ‘टॉप टेन’ घोषणा

अर्थसंकल्पातील ‘टॉप टेन’ घोषणा

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलाच अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात १० मोठ्या घोषणा केल्या आहेत.

१. हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकासाकडे जाणारा आहे. महात्मा फुले यांच्या जन्माला २०० वर्ष पूर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. ग्रामसमृद्धी अभियान राबवले जाणार आहे.

२. अजितदादा पवार यांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहिली. त्यांना श्रद्धांजली म्हणून अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरु केला जाईल. हा अर्थसंकल्प मी त्यांना समर्पित करतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

३. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे. ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार गावे जोडली. २४५० किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून २३ हजार पूलांचे काम हाती घेतले आहे. मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे.

४. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा हा सहभाग करणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे. ३० लाखांहून अधिक शेतक-यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयची मदत घेतली जात आहे. शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. अ‍ॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. १ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारीपर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे.

५. राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील. सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारणार आहोत. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर बसवणार, बांबू विकास प्रकल्प वाढवणार, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे. मुंबई आणि पुण्यात ५० अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली नवे स्टील हब म्हणून उदयास आले आहे.

६. मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु, पुणे हे जीसीसीसाठी देशात सर्वाधिक पसंतीचे शहर आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात २९५ पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

७. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार आहोत. नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहोत.

८. मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो करणार, अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार, राज्यात १ हजार २०० किमीचे मेट्रो मार्ग उभारणार आहोत. ६ हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत. २०२९ पर्यंत १६५ किमी मेट्रो मार्गिका तयार करणार आहोत. दक्षिण मुंबईला २०२८ पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार आहोत. वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार, पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

९. कर्जमाफी योजना राबवण्याचे आश्वासन दिले होते. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतक-यांना २ लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, नियमित कर्जपरतफेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.

१०. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार आहे. या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR