किनवट/नांदेड : प्रतिनिधी
श्रावण मासानिम्मित महादेवाच्या दर्शनाला आलेल्या तेलंगणातील भाविकांवर सोमवारी सायंकाळी काळाने घाला घातला. सहस्त्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन परत जातांना तोटंबा घाटात चालकाचा ताबा सुटून जीप झाडावर आढळली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच तर चालकाचा उपचारासाठी नेतांना मृत्यू झाला. यासोबत अन्य सात जण गंभीर जखमी झाले. मयतामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील कुबेर मंडळा अंतर्गत येणा-या पार्डी येथील दहा ते बारा भाविक श्रावण मासानिमित्त सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सोमवारी एपी २५ एएच ६७४७ क्रमांकाच्या कमांडर जीपने किनवट तालुक्यातील पर्यटन स्थळ सहस्त्रकुंड येथील धबधबा पाहण्यासाठी आले होते. तेथील प्रसिद्ध महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन घेऊन सायंकाळी त्याच कमांडर गाडीने परत गावी जात असताना किनवट तालुक्यातील तोटंबा जंगलातील घाटात चालकाचा भरधाव जीपवरील ताबा सुटल्याने जीप झाडावर जाऊन आदळली. या भिषण अपघातात जीपचा अक्षरश: चुरडा होऊन चौघाचा मृत्यू झाला.
तुम सायलू वय ६० वर्षे, तुम गोराबाई वय ६० वर्षे , आवला गंगाधर वय ५५ वर्षे यां तीघांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडी चालक तुळशिराम जाधव पाटील वय ३० वर्षे यांचा उपचारासाठी दवाखाण्यात नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तेलंगणातील कुबेर येथील दवाखाण्यात हालवण्यात आले. अपघाताची तोटंबा गावच्या परिसरातील गावातील नागरिकांना माहिती कळताच त्या गावक-यांनी अपघात स्थळी धाव घेत मदत केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन,भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, किनवटचे विभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम, पोलिस निरीक्षक रमेश जाधवर यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची सर्व माहिती घेतली. या अपघाताचीसर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
















